आदिवासी अतिदुर्गम जिवती तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास करा

27

🔸मानीकगड पहाडावर बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने लघु व मोठया उद्योगाची निर्मिती करावी अशी मागणी जोर धरत आहे

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.15मे):- २००२ मध्ये जिवती तालुक्‍याची निर्मिती झाली. २० वर्षे लोटूनही तालुक्यात उद्योग नसल्‍याने येथील विकास शून्‍य आहे. राेजगाराची साधने उपलब्‍ध नाहीत. त्यामुळे पोटासाठी अनेकांना स्थलांतर करावे लागते. हे चित्र कधी पालटेल, असा प्रश्‍न तालुकावासीयांना पडला आहे. जिवती तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून आहे. व चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील तालुका असल्याने इथे विकास शून्य आहे. या आदिवासीबहुल तालुक्यात शेती हाच नागरिकांच्या जगण्याचा एकमेव आधार आहे.

नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील नागरिकांच्या हाताला फक्त चार महिने काम मिळते. उर्वरित आठ महिने त्यांना हे धर, ते सोड अशीच कामे करावी लागतात. पावसाळ्याच्या दिवसांत चार महिने गावी आणि उर्वरित दिवस कामाच्या शोधात शहरात बस्तान असल्याने मुलांचे शिक्षणही धड होताना दिसत नाही. नावाला एकमेव शेती व्यवसाय आहे काही शेतकरयांना शेतीचे पट्टे आहे व उर्वरित शेतकरी अतिक्रमण धारक असल्यामुळे त्यांना कोणतेही शासकीय योजना मिळत नाही . आणि बदलत्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला भावच नाही. त्यातही शासनाकडून या व्यवसायासाठी मोठया प्रमाणात कर्ज उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यात लहान-मोठया उद्योगाची निर्मिती करून रोजगारांची गंगा प्रवाहित व्हावी, ही एकमेव आशा नागरिकांना आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे जातीने लक्ष देऊन तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास करणे गरजेचे आहे.

जिवती तालुका अतिदुर्गम, आदिवासी, नक्षलग्रस्‍त तालुका आहे. येथील नागरिकांचा मुख्य व पारंपरिक व्‍यवसाय शेती आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीतून उत्पन्न घेता येत नाही. शेतीव्‍यतिरिक्त काेणतेही उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतकरी, शेतमजूर इतकेच नव्‍हे तर युवकही रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात. तालुकावासीयांचे होणारे स्‍थलांतर थांबावे, याकरिता तालुक्यात उद्योग उभारून परिसराचा औद्याेगिक विकास करण्याची मागणी जोर धरत आहे. तालुक्यात ८४ गावे, परंतु रोजगार शून्य तालुक्‍यात ८४ गावांचा समावेश असताना उद्योग शून्य आहे. तालुक्यात मोठया प्रमाणात वनसंपत्ती व खनिजसंपत्ती आहे त्यावर आधारित उद्योगाची निर्मिती करून नागरिकांच्या हाताला कामे द्यावी.

तालुक्यात २० वर्षांपासून शासन व प्रशासना कडून ठोस पाऊल नाही, शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. शेती पिकली नाही तर शेतकरी कर्जबाजारी होत आहे. व परिणामी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळसुद्धा येते आहे. शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतमजूर, युवक, शेतकरी रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. कोराेना काळात नागरिकांचा रोजगार व उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. तालुक्यात कोणतेही लघु किंवा मोठे उद्योग नाहीत, परिणामी दिवसेंदिवस बेराेजगारांची संख्या वाढत आहे. रोजगारासाठी मोठ्या शहरात, दुसऱ्या राज्यात स्‍थलांतरित होत आहेत. येथील मजुरांच्या स्‍थलांतरणामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तालुक्याच्या निर्मितीला २० वर्षे पूर्ण झाली. परंतु शासनातर्फे अद्याप काेणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.

विदर्भाचे शेवटचे टोक व तेलंगणाला राज्याला लागून जिवती तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्यात लघु व मोठया उद्योगाची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने शासनाने तालुक्यात उद्योगाची निर्मिती केल्यास अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यामुळे बाहेरील राज्यात जाणारे मजूर, शेतकरी, युवकांचे स्थलांतर थांबेल.

कोट :- जिवती तालुक्यात उद्योगाची निर्मिती झाल्यास रोजगार निर्मिती होऊन या भागाचा औद्योगिक विकास होईल. बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. उद्योगनिर्मितीतून नागरिकांचे स्थलांतर थांबल्यास अर्थकारणाला बळ मिळेल.

– संतोष इंद्राळे, नागरिक जिवती