कर्जबाजारी शेतकऱ्यानं विष पिऊन संपवली जीवनयात्रा; ५ दिवसांपूर्वीच मुलीचे लावून दिले होते लग्न

27

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.19मे):-५ दिवसांपूर्वी मुलीचे लग्न लावून शेतकरी बापाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी गावात घडली आहे. आसाराम दत्तू सांगळे (वय-४४) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. वडवणी तालुक्यातील देवडी गावातील शेतकरी आसाराम दत्तू सांगळे हे गेल्या काही दिवसांपासून कर्जबाजारी झाले होते. ४- ५ दिवसांपूर्वीच या शेतकऱ्यांच्या मुलीचे मोठ्या थाटात लग्न झाले होते. मुलीच्या लग्नाला झालेला खर्च आणि पुर्वीचे कर्ज कसे फेडावे? या चिंतेत ते राहत होते. गेल्या ३-४ दिवसापासून मी कर्ज कसे फेडू आणि संसाराचा गाडा कसा चालवू? माझे कसे होणार? असे सारखे म्हणत होते.

या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी काल शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. विषारी औषध घेतले हे माहीत होताच, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई- वडील, चार भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.