संपूर्ण विश्वाला बुद्धांच्या धम्माची गरज आहे – प्रा. अशोक आ. शिंगाडे

27

✒️संजय बागडे(इरव्हा(टेकरी)प्रतिनिधी)मो:-9689865954

इरव्हा(टेकरी)(दि.21मे):- संपूर्ण विश्वाला बुद्धांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, शांती आणि न्यायाची शिकवण दिली. भारतातील विषमतावादी व्यवस्थेचे समर्थक असलेला समाज वर्षानुवर्षे या देशातील शूद्र, अतिशूद्र म्हणजेच आजचे ओबीसी, एस. सी., एस. टी. व इतर अल्पसंख्यांक यांच्यावर सतत अन्याय अत्याचार करीत आलेला होता. या संपूर्ण बहुजन समाजाला आपल्या गुलामीत ठेवले होते. या बहुजन समाजाला सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले होते. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता व संपत्ती साठवण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे हा संपूर्ण बहुजन समाज मागासलेला व दुबळा झालेला होता. अशातच इसवी सन पूर्व 563 ला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला.

ही समाजातील अन्याय कारक तसेच मानवी मूल्यांना नाकारणारी अवस्था बघून सिद्धार्थ गौतमाने संपूर्ण संसाराचा व सत्तेचा त्याग करून आपल्या वयाच्या 29 व्या वर्षी ते घराबाहेर पडले व 35 व्या वर्षी संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारा आणि सर्व प्राणिमात्रांना सुखी करणाऱ्या धम्माचा शोध लावला. बुद्धाच्या धम्मात ईश्वराला स्थान नाही. आत्म्याला स्थान नाही. बुद्धांनी पुनर्जन्म नाकारला. बुद्धांनी आत्मा नाकारला. बुद्धांनी विपश्यना नाकारली. बुद्धाने सांगितले की संपूर्ण जग हे अनित्य आहे. परिवर्तनशील आहे. बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी असून बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी आहे. बुद्धाने ईश्वराला नाकारून मानव केन्द्रित ‘अत्त दीप भव’ ही संकल्पना मांडली ही संकल्पना मांडणारे संपूर्ण जगातील एकमेव वैज्ञानिक तथागत बुद्ध होतं. म्हणून तथागत बुद्धांच्या तत्त्वांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा व आपले जीवन सुखमय करावे. यासाठी संपूर्ण विश्वाला बुद्धाच्या धम्माचे आज गरज आहे असे मत प्राध्यापक अशोक शिंगाडे यांनी स्थानिक ढोरपा येथील बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ढोरपा या गावात बौद्ध विहार परिसर येथे दिनांक 16 मे 2022 ला बुद्ध जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात सकाळी नऊ वाजता पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. रामदासजी खोब्रागडे तसेच प्रमुख पाहुणे मा. भिमरावजी मेश्राम, मा. शंकर जी उंबरकर, मा. महादेव जी सूर्यवंशी मा. दिवाकर जी मेश्राम, मा. राजहंस बागडे, मा. सौ. सत्यभामाताई मेश्राम, मा. सौ. प्रतिभाताई मेश्राम, मा. सौ. लीलाताई रामटेके, मा. मनोहर जी रामटेके हे मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना मा. रामदासजी खोब्रागडे यांनी बुद्धांच्या धम्माचे जीवनात पालन केल्यास स्वतःचा तसेच समाजाचा पर्यायाने राष्ट्राचा विकास होईल असे मत व्यक्त केले. प्रमुख अतिथी मा. शंकर जी उंबरकर हे आपले मनोगत व्यक्त करताना बुद्धांनी संपूर्ण जगाला मानवता शिकवली.

भारतामध्ये वर्ण व्यवस्था जातीव्यवस्था ही बळकट झालेली होती. या विषमतावादी व्यवस्थेवर बुद्धाने जबरदस्त प्रहार केला. बुद्धाच्या धम्माचे ,तत्वाचे पालन करून संपूर्ण राष्ट्र एक संघ राहू शकते ही शिकवण बुद्धाने दिली म्हणून सर्वांनी बुद्धांच्या तत्वाचे पर्यायाने धम्माचे पालन केले केले पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. बालेश बागडे यांनी तर आभार अमरदीप खोब्रागडे यांनी मानले या कार्यक्रमाला गावातील सर्व जनतेचे सहकार्य लाभले.आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.