श्याम ठाणेदार यांना राज्यस्तरीय सुनिर्मल पत्रभूषण पुरस्कार

28

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.23मे):-महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील समाज प्रबोधनात्मक लेखनाच्या कार्याची दखल घेत मुंबई येथील सुनिर्मल फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय सुनिर्मल पत्रभूषण पत्रभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. धारावी मुंबई येथील गणेश विद्या हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात मुंबईचे माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाजातील व्यक्तींचा जे आपल्या सामाजिक जाणिवेतून समाजहिताचे प्रबोधनात्मक कार्य करतात अशा व्यक्तींच्या कार्याचा गौरव म्हणून सदर पुरस्कार दिला गेला आहे. यावेळी दैनिक प्रहारचे मुख्य संपादक सुकृत खांडेकर, दिल्ली सेन्सॉर बोर्डचे सदस्य व स्तंभ लेखक विलास खानोलकर, जेष्ठ शिक्षकतज्ज्ञ डॉ लक्ष्मण शिवणेकर, दैनिक झुंझार केसरीचे संपादक मुनिर खान तसेच आयोजक आणि अध्यक्ष ऍड शैलेश खंदारे उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील पत्रकार, संपादक, कवी, लेखक, साहित्यिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभ लेखक असून महाराष्ट्रातील सर्वच वर्तमानपत्रात ते नियमित लेखन करतात.

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, विज्ञान, साहित्य अशा सर्वच क्षेत्रावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ते आपल्या लेखातून महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचवत असतात. संपुर्ण महाराष्ट्रात त्यांचा वाचक वर्ग असून आपल्या लेखणीतून ते सामाजिक प्रबोधन करत असतात. वृत्तपत्रातील लेखनाबद्दल त्यांना याआधी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक प्रबोधनात्मक लेखन कार्याचा गौरव म्हणून मिळालेल्या पुरस्काराबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.