जगी नारींना प्रेरणादायी: माता रमाई!

29

[माता रमाई आंबेडकर निर्वाण दिवस विशेष]

भारतरत्न डॉ.बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचनात दंग असत. एकदा जेवणाची वेळ झाली असता रमाईंनी त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले. साहेबांचे जेवण आटोपले असेल वाटून ताट उचलण्यासाठी त्या खोलीत जरा वेळानेच गेल्या, मात्र ताट तसेच उघडे. न राहून माईंनी त्यातल्या एका पुस्तकाचे पान उघडले आणि म्हणाल्या- या पुस्तकात नवऱ्याने आपल्या बायकोशी कसे वागावे, कुटुंबाशी कसे वागावे हे लिहिले असेल तेवढेच मला वाचून दाखवा. डॉ.बाबासाहेब म्हणतात- अगं वेडे, नवऱ्यानं संसार कसा करायचा, हे काही पुस्तकात लिहिलेल नसतं. डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या, हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी सोसत त्यांवर मात केली. बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही. आपल्या संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्या. कधी तक्रार नाही की कुठे त्याची वाच्यता नाही. अथांग दु:खाचे कधी भांडवल केले नाही. घरातील आर्थिक संकटाचा कोणासही थांगपत्ता लागू दिला नाही. एका मातेसाठी तिचा मुलगा मृत्यू पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही. त्यांचे तर एकापाठोपाठ तीन मुलगे आणि एक मुलगी औषधपाण्याविना तडफडून दगावले. म्हणूनच माईंच्या त्यागाची थोरवी गाताना कवी यशवंत मनोहर म्हणतात- रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय, जीवनाचा तो एक संपूर्ण दु:खाशय होता.

माता रमाई भीमराव आंबेडकर या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत. डॉ.आंबेडकर अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात. माता रमाई आंबेडकर यांचा जन्म दि.७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकूजी धुत्रे- वलंगकर व आई रुक्मिणी यांच्यासह रमाई दाभोळजवळील वणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ- शंकर अशी चार भावंडे होती. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकूजी दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असत. त्यांना छातीचा त्रास होता. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाईच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकूजी यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईंचा सिंहाचा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावलीच होती. त्यांनी आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही. मुंबईतील भायखळा मार्केटमधील मासळी बाजार येथे बुधवार दि.४ एप्रिल १९०६ रोजी त्यांचे भीमरावांसोबत लग्न झाले. त्यांच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील. एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात माईंना नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी शोकांतिका! पण रमाईंच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. माई संसारात रमल्या, परंतु भीमराव पुस्तकांत रमले.

डॉ.बाबासाहेब व माता रमाई राजगृहात राहत असताना बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागत होते. बाबासाहेबांनी धारवाडच्या वराळे या आपल्या मित्राकडे काही दिवसासाठी माईंना पाठविले. वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवित होते. त्यांच्या आवारात लहान मुले नेहमी खेळायला येत असत. दोन-चार दिवसांत माईंना त्या लहान मुलांचा लळा लागला. दोन दिवस झाले मुले आवारात दिसली नाहीत, म्हणून माईंनी काकांना विचारले. काका म्हणाले की मुले तीन दिवसांपासून उपाशी आहेत. वसतिगृहाला अन्नधान्यासाठी मिळणारे अनुदान अजून मिळालेले नाही. हे सांगताना वराळे काकाचा कंठ दाटून आला. तत्क्षणी रमाईने कपाटातील डब्यातील सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या, या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा, पण मुलांच्या जेवणाची त्वरित सोय करा. यावर बाबासाहेब काय म्हणतील याचा त्यांनी क्षणभरही विचार केला नाही. सोन्याच्या मूल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा मौल्यवान ठरली. अशिक्षित असूनही बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला साजेशी व स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता माईंत होती. कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व गुण त्यांच्यात असल्यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते. माईंच्या त्यागाविषयी डॉ.बाबासाहेब बहिष्कृत भारतमध्ये लिहितात- आपण परदेशी असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला ती अजूनही करावी लागत आहे. मी स्वदेशी परत आल्यावर माझ्या विपन्नावस्थेत गवताचे भारे स्वत:च्या डोक्यावर वाहण्यातही जिने मागेपुढे पाहिले नाही, अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून अर्धा तासही मला घालविता येत नाही.

बाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही खंत मन हेलावून टाकते. सन १९४०मध्ये लिहिलेला थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी माईंना अर्पण केला आहे. अर्पणपत्रिकेत ते लिहितात- हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याचे शुद्धत्व आणि याशिवाय त्याकाळी कोणी मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने व तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दर्शाविली त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण केला आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच अस्पृश्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलविता आले. दि.२७ मे १९३५ रोजी जगन्माता रमाईंचे मुंबई येथे निर्वाण झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे माता रमाई व त्यांच्या अपूर्व त्यागाला त्रिवार अभिवादन !!

✒️संकलक:-श्री. एन. कृष्णकुमार, से.नि.अध्यापक(भारतीय थोरपुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासक)गडचिरोली,व्हा.नं. ७४१४९८३३३९.