मला असाही प्रश्न पडतो-जगायचं तरी कुणासाठी..?

47

▪️जाताना मात्र प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रतिबिंब बणून जायचं▪️

माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. या कल्पना विश्वाच्या पलिकडची जी धावपळ असते. त्यालाच कदाचित जीवन म्हटल्या जात असावं. मानवी जीवनात धावपळ करायची झाल्यास त्यासाठी अंगात शक्ती असावी लागते. त्याकरीता पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतीचीही कामे करतो.

पूर्वी ८०-९० वर्षांचे आयुष्य जगायचा, काहीजण तर शतकही पार करायचे. आता ६०-७० वर्षातच बाद होतो आणि कायमच्या वारीला निघतो. वारीला गेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मृत्यूनंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं हे अंतिम सत्य… आपण कितीही चांगले असलो तरी मृत्यूनंतर आपली आठवण ही फक्त १०-१५ दिवसांपुरतीच मर्यादित असते… कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटंबापुरतंच…मी व माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं…

मग, जगावं तर ते समाजासाठी..? तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता ? तुम्ही कुणाच्या कोणत्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणायचं. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणायचं… करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा… समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय…

खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत. म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत… यातील एकही वस्तू तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचे कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.

आजपर्यंत पैशाने खूप श्रीमंत असणा-या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही… पण समाजासाठी झटणारे साधू, संत आणि अनेक थोर विचारवंत, समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं, म्हणूनच आजपर्यंत त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचंच झालं तर संत गाडगेबाबा… काय होतं त्यांच्याकडे..? फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याचं खापर आणि अंगावर फाटका सदरा… पैशाचा तर विषयच नव्हता… चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचे आणि एखाद्याने दिलेल्या भाकरीचा तुकडा खाऊन आयुष्य जगायचे… पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली, ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.

आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भलेही आपली महती साधूसंतांएवढी नसेल की, लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं तरी प्रत्येकाने चांगले प्रबोधनात्मक व कर्तुत्ववान व्हावे.

एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिकावं. ज्या कुटुंबासाठी आज आपण जगतोय, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय… तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती देता येत नाही… म्हातारे झाल्यावर आई-बाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं…

बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात, तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील… या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो की, आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?….

म्हणून समाजासाठी जगा…दान-धर्म करा, योग प्राणायम करा, ध्यान धारणा करा, भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगू द्या आणि जगून घ्या… फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटलं, तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही. म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे, तोपर्यंतच सर्व फिरून पाहून घ्या. येताना एकटे आलोय तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन हात मोकळे सोडुन जाण्यातच खरा माणूस जन्म आहे.

काय घेऊन आलोय
नि काय घेऊन जायचं?
खाली हातांनी आलोय
परंतु लाखो ह्रदयात घर करून जायचंं

✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९