अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा- दत्ता वाकसे

29

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.31मे):- रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षी साजरा करण्यात येतो. परंतु अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी अनेक समाज बांधव माथा टेकण्यासाठी येत असतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे एवढे मोठे देशातील कार्य असताना देखील आजपर्यंत त्यांच्या कार्याची दखल न घेता अवहेलना केली गेली. अनेक सामाजिक संघटना, पक्षांनी पाठपुरावा केल्यानंतरच शासकीय स्तरावर महापुरुषांची जयंती साजरी व्हावी, म्हणून गेल्या 5 वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. परंतु आजही 31 मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, म्हणून सरकारला वेळोवेळी निवेदन द्यावे लागत आहेत, ही मोठी शोकांतिका असल्याची भावना शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी व्यक्त केली.अनेक नागरिकांना इच्छा असते की, चौंडी या गावी अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्त दर्शन घेण्यासाठी जावे, परंतु सुट्टी नसल्याने अनेकांना ते शक्य होत नाही.

सर्वजन कल्याणकारी व भारताच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने प्रज्वलित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या. भारताच्या इतिहासात 28 वर्षे राज्य करणारी एकमेव महिला म्हणजे अहिल्यादेवी होळकर होत्या. 18व्या शतकातील जगातील उत्तम प्रशासक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर होत्या,असे इंग्रज लेखकांनी देखील लिहून ठेवले आहे. तसेच डॉ. ॲनी बेझंट म्हणतात, ‘भारत देशाची खरी सुपुत्री म्हणजे अहिल्यादेवी होय. कारण ती नुसती प्रजाहित पालक नव्हती, तर राष्ट्रीय ऐक्य व राष्ट्र भावनेला जतन करत सर्वत्र आपल्या खाजगी आयुष्यातून ,मालमत्तामधून समाज कार्य करणारी एकमेव राष्ट्रमाता आहे.’

अशा महान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, यासाठी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन मेल द्वारे पाठवले आहे. शासकीय स्तरावर देखील याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी शासन निर्णयामध्ये शासकीय सुट्टीचा देखील समावेश करावा, शासन दरबारी याची नोंद घ्यावी,अशी विनंती व भावना शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी व्यक्त केली.या निवेदनावर सुनील वाकसे,अ‍ॅड . कल्याण कोकरे, सचिन मार्तंड, दिलीप गडदे, अनिकेत विश्वाराव, आदींची नावे आहेत.