जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कारवाई करा अन्यथा आंदोलन छेडू : जनशक्ती संघटनेने दिला इशारा

31

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.23जून):-निसर्गाच्या लहरी आणि शासनाच्या अधांतरी कारभारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मशागत, पेरणी, बागांची छाटणी यासारखी शेतीची कामे करण्यासाठी पैशाची उपलब्धता होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी परवाना व विनापरवानाधारक सावकारांची दरवाजे ठोठावले. मात्र या सावकारांकडून सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू असून सोनार, सावकार अशा लोकांवर कारवाई करा अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला असून हे निवेदन जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सोलापूर व सहकार आयुक्त, पुणे यांना दिले आहे.

या दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, परवाना व विना परवानाधारक सावकार सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती, दुचाकी, चार चाकी आणि सोने गहाणवट ठेवून आर्थिक पुरवठा करत असतात. यासाठी वार्षिक व्याजदर १२ ते १५ टक्के असणे आवश्यक आहे, तसा शासकीय नियम आहे. मात्र या नियमाला पूर्णपणे हरताळ फासला जात असून हे सावकार दरमहा ३ ते १० टक्के पर्यंत आकारणी करून शेतकऱ्यांना त्रास देत आहेत.
शासकीय नियम आणि कचाट्यात सापडू नये म्हणून एखाद्याची दोरीवर नाव, तारीख व रक्कम या लोकांचा राजरोसपणे व्यवहार सुरू आहे. काही सावकार शेती लिहून घेतात व मुदत संपली असे सांगून गोरगरीब शेतकऱ्यांची शेती बळकावतात असे शेकडो घटना जिल्ह्यामध्ये घडल्या आहेत. अनेक ठिकाणी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवसावर पैसे देऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची होणारी ही आर्थिक पिळवणूक व लूट जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन थांबवावी अशी विनंती जनशक्ती संघटनेने केली असून पिऊ लूट न थांबल्यास जिल्ह्यातील हजारो पिळवणूक झालेल्या शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राज सलगर, प्रदेशाध्यक्ष उमाकांत तिडके पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाबाराजे कोळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भोसले राणा वाघमारे, कल्याण गवळी, गणेश वायभासे गणेश ढोबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.