उद्धव ‘ठाकरे’ नाहीत, ‘ठाकर’ आहेत-हेमंत पाटील

29

🔸पक्ष प्रमुखामुळेच शिवसेना रसातळाला गेल्याचा दावा

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.24जून):-महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अभूतपुर्व राजकीय परिस्थितीला सर्वस्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जवाबदार आहेत. उद्धव ‘ठाकरे’ नाहीत तर ‘ठाकर’आहेत, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केला. शिवसेना संपवण्यात उद्धव ठाकरेच जवाबदार आहेत. बंड पुकारणाऱ्या आमदारांनी पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून हा निर्णय घेतला. मातोश्रीची दारे मंत्री, आमदारांसाठी उघडी नव्हती. त्यांना तासंतास बसून ठेवले जात होते.तर, कधी उद्धव ठाकरे भेटत नव्हते.त्यांची कामे होत नव्हती.त्यामुळेच शिवसेना रसातळाला गेली आहे.

आता हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेना वाढवण्याचे काम एकनाथ शिंदे करतील, असा दावा देखील यानिमित्ताने पाटील यांनी केला. पुढच्या काळात भाजप आणि शिंदे गटाची युती होईल.जर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले तर न्यायालय देखील शिंदे गटाच्या बाजूने निकाल देईल.राज्यपाल सुद्धा जास्त संख्याबळ असलेल्या शिंदेच्या बाजूनेच कौल देतील, असे भाकित पाटील यांनी वर्तवले आहे.

ठाकरे यांनी केवळ शिवसेनेचा वापर करून घेतला.केवळ प्रसिद्धी माध्यमातून संजय राऊत रोज सकाळी येवून बरळतात.ठाकरे यांनी विकासाची कामे केली नाही. हिंदुत्वाच्या मुद्दयालाच त्यांनी हात घातला नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधामुळेच गेल्या अडीच वर्षात हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवल्याने ठाकरे सरकार कोसळणार आहे.बाळासाहेबांनी ज्या हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेना चालवली ते उद्धव ठाकरेंना जमले नाही.त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देत पक्ष टिकवण्यासाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी शिंदे गटाचे समर्थन करावे, असे आवाहन पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.