सख्खा भाऊच झाला वैरी; साखरेसाठी वस्तऱ्याने कापला गळा

27

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(1जुलै):-साखर चोरी केल्याचा आरोप करीत लहान भावाने वस्तऱ्याने गळ्यावर वार करून मोठा भाऊ व वहिनीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना सोमवारी रात्री कपिलनगरमधील नारी गावात घडली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातारण आहे. रामचंद्र दादुजी जिचकार व त्यांच्या पत्नी सुषमा, असे जखमी दाम्पत्याचे तर राजू जिचकार (वय ३८),असे हल्लेखोर भावाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रामचंद्र व राजू मजुरी करतात. सोमवारी सकाळी एक पाव साखर चोरी केल्याचा आरोप राजू याने सुषमा यांच्यावर केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. सायंकाळी रामचंद्र घरी आले. सुषमा यांनी रामचंद्र यांना याबाबत सांगितले. रामचंद्र यांनी राजू याला जाब विचारला. त्यांच्यातही वाद झाला. रामचंद्र व सुषमा या रात्री छतावर झोपले असताना राजू हा छतावर गेला. त्याने वस्तऱ्याने रामचंद्र यांच्या गळ्यावर वार केले. रामचंद्र यांनी आरडओरड केली. सुषमा या मदतीसाठी धावल्या. राजू याने सुषमा यांच्या गळ्यावरही वार केला.

सुषमा या जीव वाचवून घराबाहेर आल्या. शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्याने पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने कपिलनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेत राजूही जखमी झाला. त्यालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी राजूविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.