मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे, संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा-‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

54

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.28जून):-चिथावणीखोर वक्तव्य करीत राज्यातील विविध भागांमध्ये कायदा,सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केली. यासंबंधी त्यांनी पुण्यातील डेक्कन जीमखाना पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली असून पुणे शहर पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालकांना देखील पत्र पाठवून संबंधीत नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनी कटकारस्थान रचून समाजविघातक व समाजकंटकांना फुस लावून विविध जिल्ह्यातील शिवसेना बंडखोर आमदारांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करीत सार्वजनिक मालमत्तेची नासधुस करण्यास प्रवृत्त करीत राज्यातील शांतता भंग केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद मध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे अराजकतेचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा देखील पाटील यांनी तक्रारीतून केला आहे.

आसामची राजधानी गुवहाटी वरून बंडखोर आमदाराची मृत शरीर येतील, असे धक्कादायक वक्तव्य राऊत यांनी केली. तर, आदित्य ठाकरे यांनी ‘मंत्रालयाचा मार्ग वरळीवरूनच जातो’ अशी अप्रत्यक्ष धमकी बंडखोरांना देत रस्त्यावरची लढाई लढू असे संकेत देत चिथावणीखोर वक्तव्य करीत जनतेमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पाटील यांनी केला. बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. अशात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचे चित्र आता निर्माण झाल्याने प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली.