कलमी नेत्यांची जुलमी सत्ता!

114

काही महिन्यांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण झालेला बघायचं आहे असं वक्तव्य केलं होतं. नंतर काही दिवसांनी सदाभाऊ खोतांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचं स्वप्न बघतो असं म्हटलं. इथे ८५ टक्के बहुजन समाज आहे.जेव्हा हा समाज बहुसंख्य आहे तर स्वप्न ही बहुसंख्यांकांनी बहुसंख्यांकासाठी पाहायला पाहिजे. खरे तर दानवेंनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं आहे असं म्हणायला पाहिजे होतं. सदाभाऊ खोतांनी ही मला मुख्यमंत्री झाल्याचं होण्याचं स्वप्न पडतं असं म्हणायला हवं. किंवा आपल्यातील लायक लोकांची नावं घ्यायला हवी होती.परंतु स्वतःला ओबीसी समाज कायम नालायक समजतो. अनंत काळापासून हा समाज ब्राह्मणांच्या वर्चस्वाला छेद देण्याची हिंमत दाखवत नाही.८५ टक्के बहुजन समाज साडेतीन टक्के लोकांची सलामती, त्यांची ख्यालीखुशाली जपण्यासाठी तत्पर असतो.

एकनाथ खडसे भाजपात असताना त्यांच्या वयाचं कारण पुढे करून त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाद केलं.पण वयानं थकलेले मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून बहूजन समाजाने खपवून घेतला होता.फडणवीस खडसेंपेक्षा खुप लहान आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द खडसेंपेक्षा कमी आहे. तरीही बहुजनांनी मुख्यमंत्री पदाचा मान फडणवीसांना दिला. खरेतर विधानपरिषदेत, विधानसभेत ब्राह्मण किती असतील? पण संपूर्ण महाराष्ट्र नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस नागपूरातुन चालवतात.

आज ओबीसी आरक्षण वादाच्या भोवऱ्यात आहे.आणि ब्राह्मणांना १० टक्के आरक्षणाची घोषणा झाली. हे घडलं कारण ओबीसी च्या आरक्षणासाठी ओबीसी नेत्यांमध्ये सुसंवाद नाही. ह्यांची आपसातच खेचाखेच सुरू आहे.महाविकास आघाडीत बीघाडी निर्माण झाली. आणि एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बाहेर पडले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदू , राज्यपाल हिंदू, अध्यक्ष, सभापती सारेच हिंदू. इतकेच काय तर देशाचा प्रधानमंत्री,राष्ट्रपती हिंदू. मग एकनाथ शिंदे कोणतं हिंदुत्व सांगतायत? आज ही परिस्थितीच नाही. देशातील धार्मिक वातावरण एवढं दुषित झालंय की आपला बहुजन समाज एकमेकांना पाण्यात पाहायला लागला आहे. इथे कुणी हिंदू,मुस्लिम,बौद्ध,शिक …… असण्याशी कुणाला काही देणं घेणं नाही. हिंदूत्व हे राजकीय खेळीतील हत्यार आहे. निवडणूकीच्या लढाईत ते प्रभावी साधन आहे, असं राजकारण्यांना वाटतं. हिंदुत्व ही रिकाम्या डोक्यात ठेवलेली वस्तू आहे.

ती आवश्यक त्या वेळी उचलायची आणि परत ठेवायची. ईतक्यानं हिंदूत्वाची उपयोगीता संपत नाही. तर सतत आतबाहेर करण्याची राजकारण्यांना गरज वाटते. त्याचाच एक भाग म्हणून शिंदेंनी हिंदुत्वाला हात घातला. शिंदे म्हणतात बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं हिंदूत्व कुठेय? ह्याचा अर्थ हिंदूत्व ही माणसागणिक बदलत जाणारी संकल्पना आहे का ? बाळ ठाकरेंनी हिंदूत्व खा. हिंदूत्व प्या. एव्हढंच सांगितलंय का? जो उठतो तो आमचं हिंदूत्व असं नाही. त्यांचं हिंदूत्व तसं नाही,हे सांगतो. मग हिंदू खतरेमे हैं असं ही सांगितलं जातं. देशात सरकार हिंदूंचं आहे. मग हिंदू खतरेमे कसा? राज्यातील आणि देशातील एकूणच प्रखर हिंदुत्व बघुन, बौद्धांनी बौद्ध खतरेमे, मुसलमानांनी मुस्लिम खतरेमे शिकांनी शिक खतरेमे…. असं म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पण देशातील हे सर्व धर्म शांत आहेत.त्यांनी राजकारणात धर्म आणला नाही. हिंदूत्व खतरेमे असेल तर कुणामुळे आहे? हिंदू धर्म नाही.ती एक जीवन पद्धती आहे असं मोहन भागवतांचं वक्तव्य आहे. कारण ब्राह्माणांचा वैद्धीक धर्म आहे. त्यामुळे ते हिंदूत्वाचं उदात्तीकरण करत नाही. भागवतांना त्यावेळी किती हिंदुत्ववाद्यांनी जाब विचारला?. ज्या वेळी भागवतांना हिंदूत्व समजावण्याची गरज होती तेव्हा सगळे हिंदूत्ववादी गप्प राहिले.

आणि आता एकनाथ शिंदेंना हिंदूत्वाची आठवण आली. केवळ हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपशी युती व्हावी , भाजपशी सत्ता स्थापावी असं शिंदेंसह अनेक आमदारांना त्यावेळी वाटलं. आणि असा खुलासा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दिपक केसरकरांनी केला. मग तेव्हाच हे सगळे शिवसेनेतून बाहेर का नाही पडले? अडिच वर्षे सत्ता भोगल्यानंतर भाजप शेनेच्या हिंदूत्वातील फरक शिंदेंना कळायला लागलं. आणि शेनेपेक्षा भाजपचं हिंदूत्व बरं अशी ह्यांना जाणीव झाली , ही चमत्कारिक बाब म्हणावी लागेल. हे तर, सव चुहे खाके बिल्ली……, असं झालंय.

एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांना हिंदूत्वाशी काही देणं घेणं नाही. आपला राजकीय प्रवास सुखकर व्हावा आणि सत्ता काळात खाल्लेलं पचवता यावं म्हणून हा घुमजाव आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले हात भाजपच्या सहकार्याशिवाय धुवून स्वच्छ करता येत नाही, असा सगळ्यांचा विश्वास झालाय. ईडीची पिडा टाळायची असेल तर भाजपला साथ हाच ह्यांच्याकडे पर्याय आहे. दुसरं असं, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने भविष्यात जनतेतून निवडून जाताना दमछाक होणार हे कळुन चुकल्याने बंडाचा झेंडा फडकला. हे सारं बंडखोरांच्या गरजेतून घडलं. पण ह्यांचं श्रेय नाहक फडणवीसांना देणारी बहुजनातील एक जमात आहे. आम्ही लहान असताना आमचे आजोबा भोसले राजांच्या काही गोष्टी सांगायचे.राजे लाखांदूरला आले की, आम्ही लहान असताना राजेसाहेबाची गारगुडी ओढायचो. मग राजे खुष व्हायचे आणि आम्हाला एक आना, दोन आना द्यायचे. काही दिवस राजेंचा मुक्काम अंबारखान्यात असायचा. ते शिकारीसाठी जंगलात जायचे.राजे मचानावर बसले असायचे.बाकी लोक हाका करायचे.राजांच्या दिशेने शिकार न्यायचे. गोळी कुणाचीही लागली तरी राजेसाहेबांनी शिकार केली, राजेसाहेबांची गोळी लागली असा एकच गलका व्हायचा. शिकार कुणीही केली तरी श्रेय राजेसाहेबांनाच जायचं. तसेच बहुजन समाजातील नेते आपल्या जडणघडणीचं श्रेय, ब्राह्मणांना देतात. हा राजकीय भूकंप केवल फडणवीसांनी केला असा एक सूर आता येऊं लागलाय.दानवे, केसरकर आणि अनेक नेते म्हणजे बहुजन समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड बहुजन ऐक्याला कायम पोखरत राहिली आहे.

आज ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, नोकर भरती, बढती, बेकारी …….. आणि शिक्षण अशा अनेक समस्या असतांना हिंदूत्वाचा गाजावाजा करत बहुजनांच्या,ओबीसी च्या गंभीर प्रश्नांकडे ओबीसी नेत्यांचं दुर्लक्ष आहे. ओबीसी, मराठा, धनगर आणि मुस्लिम समाज आरक्षणासाठी बोंबा मारतोय. आणि नेते पक्ष बदलून मजा मारतायत. आता शिंदेंना कदाचित उपमुख्यमंत्री पद दीलं जाईल. पण हे घटनात्मक पद नाही. त्यात कुठलेही अधिकार नाहीत. हे पद मिळविण्यासाठी धडपडणं म्हणजे, “दील के तसल्लीके लिए गुळ की जिलेबी खाणी चाहिए” म्हणतात तसं आहे. ओबीसी,बहुजन समाजाचे नेते मेहनत करतात. यश खेचून आणतात पण त्यांचं श्रेय फडणवीस, गडकरींना देतात. आपली लायकी, कुवत, क्षमता वगैरे त्यांना महत्वाची वाटत नाही. समाजासाठी ह्या नेत्यांचं योगदान शून्य आहे.

एखाद्या झाडावर कलम करतात तेव्हा त्या कलमेला मुळ झाडाची पोषक तत्वे मिळतात. आणि कलम तशाच चविची फळं, फुलं देते. ओबीसी, बहुजन नेते गडकरी, फडणवीसांच्या पोषक (?) तत्वावर मोठी झालेली दिसतात. म्हणून ते त्यांच्याच हिताची कामे करतात. त्यामुळे ब्राह्मणांना दहा टक्के आरक्षण. पण ओबीसी चा इंपेरिकल डेटा अडलाय. हे आपल्या नेत्यांचं अपयश आहे.समाज पायदळी तुडवून सत्ता भोगणारी, ब्राह्मण कैवार घेणारी कलमी नेत्यांची जमात आपण पोसली आहे. तेव्हा कलमी नेत्यांची जुलमी सत्ताच येणार. आपल्यातील असंघटित नेत्रुत्वामुळे साडेतीन टक्केवाल्यांचा फडणवीस मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असे स्वप्न बघतो.ह्यातुन ओबीसी,बहुजन समाजाने धडा घेणं गरजेचं आहे.

✒️राजू बोरकर(लाखांदूर,जिल्हा-भंडारा)मो:-७५०७०२५४६७