निवडणूक आयोग अँक्टिव्ह; महाराष्ट्रातील 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींचा ऑगस्टमध्ये उडणार धुरळा

80

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

मुंबई(दि.29जून):-राज्यात एका बाजूला सत्तासंघर्ष सुरु असतानाच राज्य निवडणूक आयोग अॅक्टिव्ह झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आयोगाने राज्यात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. या ग्रामपंचायतीसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असून 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार या सर्व गावांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.

मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तिथल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा असणार निवडणूक कार्यक्रम :

संबंधित तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या :

नाशिक : बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6.

धुळे : धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1. जळगाव: रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6.

अहमदनगर : अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3, शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3.

पुणे : हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2.

सोलापूर : सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2, करमाळा- 8, पंढरपूर : 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4.

सातारा : कराड- 9 आणि फलटण- 1.

सांगली : तासगाव- 1.

औरंगाबाद : औरंगाबाद- 1, पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3, जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2.

बीड : बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5.

लातूर : रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4.

उस्मानाबाद : तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1.

परभणी: सेलू- 3.

बुलढाणा : खामगाव- 2 आणि मलकापूर- 3.

अशा एकूण- 271 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.