जयभवानीची गाळप क्षमता वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना फायदा होईल – अमरसिंह पंडित

37

🔹जयभवानी कारखान्याचा रोलर पुजन समारंभ संपन्न

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.6ऑगस्ट):-जयभवानी साखर कारखान्याची प्रतीदिन गाळप क्षमता अडीच हजाराहून पाच हजार मे.टन झाली आहे, जुन्या यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण केल्यामुळे भविष्यात कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप जयभवानी करेल. गाळप क्षमता वाढल्यामुळे ऊस उत्पादकांना निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. ह.भ.प. जनार्धन महाराज यांच्या शुभहस्ते जय भवानीचे रोलर पुजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी व संचालक उपस्थित होते.

जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा रोलर पुजन समारंभ मच्छिंद्रनाथ गडाचे महंत मठाधिपती ह.भ.प.जनार्धन महाराज यांच्या शुभहस्ते शनिवार, दि.6 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, संचालक पाटीलबा मस्के, भाऊसाहेब नाटकर, अप्पासाहेब गव्हाणे, पांडुरंग गाडे, सुनिल पाटील, संदिपान दातखीळ, प्रकाश जगताप, साहेबराव पांढरे, शिवाजी कापसे, श्रीहरी लेंडाळ, जगन्नाथ दिवाण, उपसभापती शाम मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प.जनार्धन महाराज यांनी शुभाशिर्वाद देवून कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊसाच्या नोंदी घेताना अतिशय पारदर्शकपणे प्रक्रिया राबविण्यात येत आहे, गावा-गावात ऊसाच्या नोंदी शेतकऱ्यांना वाचून दाखवण्यात येत असून ग्रामपंचायत कार्यालयात त्याची एक प्रत डकविण्यात आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी काही आक्षेप असल्यास तातडीने या बाबत कारखान्याच्या शेतकी विभागात लेखी अर्ज करावा, कारखाना सुरु झाल्यानंतर कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय नियमाने ऊस तोडणीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. जयभवानी कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून इतर उत्पादने वाढविण्यावर कारखान्याने भर दिला आहे. येणाऱ्या हंगामात कार्यक्षेत्रातील नोंद झालेल्या सर्व ऊसाचे जयभवानी गाळप करणार असून योग्य भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालक श्रीराम आरगडे यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी मानले, याप्रसंगी जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, चिफ इंजिनिअर अशोक होके, शेतकरी अधिकारी शिंदे, चिफ अकाऊंटंट सौरभ कुलकर्णी, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, डिस्टलरी इनचार्ज राजेंद्र बडे, सिव्हील इंजिनिअर भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतुक ठेकेदार, कामगार, कर्मचारी, अधिकारी व सभासद कार्यक्रमास उपस्थित होते.