मुहर्रम काय आहे?

32

देशबांधवांनो…आपल्या सर्वांना माझा सादर सलाम!

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे रोज सण आणि उत्सव साजरे होतांना दिसतात आणि त्या बद्दल सर्वांना आपुलकी असते त्याच प्रमाणे मोहर्र्म सुद्धा अश्याच प्रकारचा सण आपल्या इथे अनेक वर्षांपासून साजरा होत आहे तर या संदर्भात अनेक मुस्लिमेत्तर बांधव मुहर्रमसंदर्भात प्रश्न विचारतात.

सोशल मिडीयावर त्यांची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येते. विविध सोशल मिडिया स्थळांवर मोहर्रम ट्रेंड करीत आहे. मुस्लिमेत्तर बांधव मुहर्रम काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. सोशल मिडीयावर व्यक्त होणाऱ्या अनेकांनी आपापल्या परीने काही का होईना परंतु माहिती संकलित करून इतरांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. आजचा हा लेख माझ्या या जिज्ञासू मित्रांसाठी.

इस्लामचे मूलाधार:-
इस्लाम दोन आधारांवर उभा आहे. पहिला आधार कुरआन तर दुसरा हदीस. कुरआन अल्लाहतर्फे मानवजातीला देण्यात आलेला अंतिम मार्गदर्शन ग्रंथ आहे तर त्या मार्गदर्शन ग्रंथाचे प्रेषित मुहम्मद [स.] यांनी केलेले विवेचन, प्रेषितांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांनी अल्लाहच्या संदेशाचे केलेले विश्लेषण म्हणजे हदीस. इस्लामचा अभ्यास करताना या दोन्ही आधारांना समोर ठेवूनच इस्लाम समजून घ्यावा लागतो. या आधारांवर जो धर्म उभा असेल तो म्हणेज इस्लाम. मुस्लिमांच्या ज्या कृतीला या दोन्ही स्त्रोतांत आधार भेटणार नाही त्या गोष्टीचा इस्लामशी काहीच संबंध असणार नाही.

इस्लामी कॅलेंडर:-
मानवजातीला दिनदर्शिका अथवा कॅलेंडर उपलब्ध करून देणे हा धर्माचा उद्देश नाही. मात्र ज्या तत्कालीन संदर्भात धर्मादेश दिले जात आहेत, त्या काळात एखादा सामाजिक प्रश्न मानवी जीवनाला प्रभावित करीत असेल तर धर्म त्याबद्दल जरूर भाष्य करतो. अंतिम प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या काळी वर्षाचे निर्धारण टोळीप्रमुखांच्या सोयीनुसार केले जायचे. ते वर्षाला हवे तसे फिरवायचे; कमी जास्त करायचे. कधी 13 महिन्यांचा वर्ष करायचे तर कधी 11 महिन्यांचा. तेव्हा कुरआनने वर्षातील महिन्यांचे निर्धारण केले. या संदर्भात कुरआनमध्ये जो उल्लेख आला आहे तो असा आहे, “आकाश आणि पृथ्वीची निर्मिती केल्यापासून अल्लाहच्या लेखी महिने बाराच आहेत, त्यापैकी चार निषिद्ध आहेत.”

या आयतीत वर्षाचे महिने बाराच असल्याचे बजावून सांगण्यात आले आहे. या संख्येत बदल केला जाऊ शकत नाही. यामुळे कॅलेंडरला स्थिरता प्राप्त होते आणि कालनिर्धारण सहज शक्य होते. आधुनिक काळातील इस्लामी कॅलेंडरमधील 12 महिने प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या जन्मापूर्वीपासून अरब लोकांत प्रचलित असलेले प्राचीन महिने आहेत. या महिन्यांची कालगणना चंद्राधारित असल्याने यातील दिवसांची संख्या 354किंवा 355 इतकी आहे. इतिहासकार अल बैरुनी आणि इब्न मसुदी यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले आहे.

निषिद्ध महिने:-
अरब लोक जातीचे लढवय्ये. नेहमी लढायात मग्न राहणारे. या लढायांचा त्यांच्या समाजजीवनावर मोठा प्रभाव पडायचा. नेहमीच्या लढायांमुळे त्यांच्या सामाजिक जीवनाला स्थिरता नव्हती.

मात्र अरबस्थानच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अल्लाहच्या पुरातन उपासना गृहाच्या – काबागृहाच्या – यात्रेसाठी शांतता अनिवार्य होती. तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जन्माच्या हजारो वर्षांपूर्वी हजयात्रेचे महिने निषिद्ध महिने म्हणून घोषित करण्यात आले.

हे महिने आधुनिक इस्लामी कॅलेंडरचे 11 आणि 12 वे महिने जिलकदा आणि जिलहज्जा आहेत. हजयात्रेकरूंना प्रवासात लुटमार आणि टोळीयुद्धांचा त्रास होऊ नये म्हणून जिलहज्जानंतरचा एक महिना – मोहर्रम – असे एकूण तीन महिने निषिद्ध महिने म्हणून घोषित करण्यात आले.

या महिन्यांत युद्ध निषिद्ध केले गेले. जेणेकरून या महिन्यांत युद्धबंदी लागू व्हावी आणि लोकांना अल्लाहच्या पुरातन गृहाच्या यात्रेला सुरक्षितपणे जाता-येता यावे. तसेच या महिन्यांत अरबी टोळ्यांना शांतीचे आणि आनंदाचे जीवन जगता यावे. या महिन्यांचे निर्धारण प्रेषित मुहम्मद [स.] यांनी नव्हे तर अल्लाहतर्फे करण्यात आले. ‘जिलकदा’ आणि ‘जिलहज्जा’ चे प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या काळात हजचे महिने म्हणून निर्धारण करण्यात आले. ‘मुहर्रम’ चा महिना प्रेषित मुसा [अलै.] यांच्या काळात निषिद्ध करण्यात आला. कालांतराने ‘रजब’ देखील निषिद्ध करण्यात आला.

अशाप्रकारे अरब समाजात वर्षाच्या 12 महिन्यांपैकी वरील 4 महिने निषिद्ध घोषित करण्यात आले. प्रेषित मुहम्मद [स.] परममित्र अबू बकर [रजि.] यांच्या कथनानुसार, “वर्षाच्या 12 महिन्यांपैकी 4 निषिद्ध आहेत. तीन तर सलग येतात, जिलकदा, जिलहज्जा आणि मुहर्रम आणि शेवटचा आहे रजब.” म्हणजेच या चार महिन्यांचे निर्धारण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पूर्वीच झाले होते. म्हणून या चार महिन्यांच्या निषिद्ध असण्याचा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी किंवा त्यांच्या काळातील तत्कालीन परिस्थितींशी काहीच संबंध नाही.

आशुराचे महत्व:-
इस्लामी कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या मुहर्रमच्या 10 तारेखेला आशुरा म्हणतात. या आशुराचे महत्व काय? प्रेषित मुहम्मद यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले असता तेथे त्यांना ज्यूंशी जवळीक साधण्याची संधी मिळाली.

ज्यू म्हणजे प्रेषित मुसा [अलै.] यांचे अनुयायी, पूर्वाश्रमीचे मुस्लिम. प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या सोबत्यांनी पाहिले की ज्यू 10 मुहर्रम रोजी रोजाचे पालन करतात. तेव्हा प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या अनुयायांना प्रश्न पडला की ज्यू या दिवशी रोजाचे पालन का करतात? रमजानचे रोजे तोपर्यंत अनिवार्य करण्यात आले नव्हते.
सोमवार आणि गुरुवारच्या प्रोत्साहित रोजांव्यतिरिक्त जिल्हज्जाचे ऐच्छिक रोजे प्रेषित मुहम्मद [स.] आणि त्यांचे सोबती नेहमी पालन करीत असत.

तेव्हा 10 तारखेच्या विशेष रोजाचे औचित्य काय, हा प्रश्न प्रेषितांच्या सोबत्यांना पडला. त्यांनी यहुद्यांकडे यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या दिवशी अल्लाहने फिरऔनच्या अन्याय आणि अत्याचारातून त्यांना मुक्त केले होते. म्हणून अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते या दिवशी रोजाचे पालन करतात.

तेव्हा प्रेषित मुहम्मद [स.] यांनी आपल्या सोबत्यांना आदेश दिला की अल्लाहच्या कृतज्ञतेसाठी त्यांनीही या दिवशी रोजाचे पालन करावे. कारण शिकवणीवर आचरण करण्याच्या बाबतीत मुस्लिम ज्यूंच्या तुलनेत मुसा [अलै.] यांच्या जास्त जवळ होते. तसेच अल्लाहच्या प्रेषितांनी मुहर्रमच्या रोजाला रमजानच्या रोजानंतर सर्वोत्तम रोजे म्हटले आहे.

काय आहे मुसा [अलै.] यांची घटना?
प्रेषित इब्राहीम [अलै.] यांच्या पुत्रांपैकी थोरले इस्माईल अरब भूभागात स्थाईक झाले तर धाकटे इस्राईल येरुशलेम येथे स्थाईक झाले.

प्रेषित इस्राईल यांचे पणतू युसुफ यांच्या काळापर्यंत इस्राईली वंश येरुशलेम येथेच वस्ती करून राहत होता. मात्र प्रेषित युसुफ [अलै.] यांच्या काळात प्रांतातील दुष्काळाने प्रभावित होऊन इस्राईलींनी इजिप्त देशी स्थलांतर केले.

ही घटना ई.स.पूर्व 1700 च्या आसपासची. ई.स.पूर्व 1700 पासून इस्राईली इजिप्तमध्ये वस्ती करून राहू लागले. परंतु इसपूर्व 1350 मध्ये इजिप्तच्या तत्कालीन राजाने इस्राईलीवर अन्याय आणि अत्याचारास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात इस्राईलींची कत्तल केली. इस्राईली वंशाला गुलाम बनवून त्यांचे सामाजिक दमन सुरु केले. तेव्हा अल्लाहने प्रेषित मुसा [अलै.] यांच्या द्वारे इस्राईलींना इजिप्तमधून बाहेर काढले.

तत्कालीन शासकाच्या जुलमी राजवटीतून इस्राईलींची सुटका केली. त्यांना पुनश्च येरुशलेमच्या भूमीवर वसविले.
तत्पूर्वी इस्राईलीचा पाठलाग करणाऱ्या इजिप्ती शासकाला त्याच्या लष्करासह समुद्रात बुडवून टाकले.

ही घटना 10 मोहर्रम रोजी घडली होती. म्हणून याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इस्राईली अर्थातच यहुदी 10 मोहर्रम रोजी उपवास ठेऊ लागले. या घटनेचा सविस्तर वृतांत कुरआनबरोबरच बायबल ग्रंथातही नमूद करण्यात आला आहे.

मुहर्रम आणि करबला:-
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे नातू हुसैन यांच्या हत्येची, करबला युद्धाची दु:खद आणि हृदयद्रावक घटना जरी मुहर्रम महिन्यात घडली असली तरी मुहर्रमच्या निषिद्ध असण्याचा करबलेच्या घटनेशी काहीच संबंध नाही. इस्लाममध्ये कोणत्याही व्यक्तीला इतके महत्व नाही की त्याच्या कृत्यामुळे किंवा त्याच्याशी घडलेल्या कृत्यामुळे एखाद्या दिवसाला त्याच्यासाठी खास केले जावे.

इस्लाम आपल्या अनुयायींची जी काही मानसिकता तयार करतो, त्यामध्ये व्यक्तीनिष्ठेला काडीमात्रही स्थान नाही. व्यक्ती कितीही मोठी असो, महान असो, थोर असो; ती व्यक्ती मरताच मुस्लिम समाज त्याच्या थडग्यावर माती टाकतो, त्या व्यक्तीला त्याच्या सर्व अस्तित्वासह मातीत पुरून तो येणाऱ्या उद्यासाठी सज्ज होतो. इस्लाम व्यक्तीनिष्ठ नव्हे तत्वनिष्ठ धर्म आहे.

जेथे व्यक्तींना नव्हे तर तत्वांना केंद्रीय स्थान प्राप्त आहे. म्हणूनच येथे ना कोण्या व्यक्तीची जन्मतिथी साजरी केली जाते, ना कोण्या व्यक्तीची पुण्यतिथी साजरी केली जाते. व्यक्तीच्या कर्तत्वाचा उल्लेख तर गेला जातो, कार्याचा गौरवही केला जातो; परंतु व्यक्तीच्या अंधानुकरणाला किंवा व्यक्तिपूजेला येथे कसलाच वाव नाही.

10मुहर्रम आणि मुस्लिम समाजातील कुप्रथा:-
मुहर्रम मातमचा नव्हे, कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना आहे. हा दुःखाचा नव्हे, क्षमेची याचना करण्याचा महिना आहे.

10 मुहर्रम अर्थात आशुराच्या दिवशी मातम नव्हे तर रोजाचे पालन करणे अभिप्रेत आहे.

प्रेषित मुहम्मद [स.] यांनी तशी सूचना देखील केली आहे. 10मुहर्रम अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिन्हात्मकदृष्ट्या निर्धारित करण्यात आलेला दिवस आहे.

मात्र यादिवशी भारतीय मुस्लिमांचे आचरण अगदी विपरीत आहे. अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दिवशी ‘मातम’ करणे प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या शिकवणींची जाहीर थट्टा आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु या दुःखाचा कालावधी किती असू शकतो? जास्तीत जास्त काही मोजके दिवस. हाताच्या बोटावर मोजता यावेत इतके दिवस? यापलीकडे तुम्ही किती दिवस रडत बसणार? दुःखाचे जाहीर प्रकटन करताना अनेक कुरापती जन्माला येतात. तेव्हा इस्लामने या कुरापतींना आळा घालण्याचे सारे प्रबंध करून ठेवले. रडताना मोठ्याने आरडाओरडा करू नये, आपल्या गालावर मारून घेऊ नये, डोक्यावरची केसं ओढू नये, कपडे फाडू नये यासारखे एक नाही कित्येक उपदेश प्रेषितांनी केले. प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या पेक्षा जास्त प्रिय मुस्लिमांना आणखीन कोण असू शकतो? परंतु प्रेषितांच्या मृत्युसमयी काय अवस्था होती मुस्लिमांची? मदिनात भयाण स्मशान शांतता पसरली होती.

या भयाण शांततेत साऱ्यांचेच अश्रू विरत चालले होते. दुसरे खलिफा उमर [रजि.] यांना देखील शहीद करण्यात आले होते. तिसरे खलिफा उस्मान [रजि.] यांची देखील निर्मम हत्या करण्यात आली होती. चौथे खलिफा आणि प्रेषितांचे जावई अली [रजि.] यांची देखील बंडखोरांकडून हत्या करण्यात आली होती.

यापैकी कोणाच्याच मृत्यूचे दु:ख आज साजरे केले जात नाही, हे विसरता कामा नये.

कुरआनचे थोर भाष्यकार इमाम इब्न कसीर हुसैन यांच्या मृत्यूचे मातम करणाऱ्याबद्दल भाष्य करताना म्हणतात, “हुसैन [रजि.] यांचे वडील त्यांच्यापेक्षा थोर होते आणि त्यांना देखील शहीद करण्यात आले.

परंतु मातम करणारे त्यांच्या मृत्यूचा शोक साजरा करीत नाहीत. रमजान महिन्याच्या 17 व्या दिवशी शुक्रवारी फजरच्या नमाजनंतर मस्जिदीतून बाहेर पडत असताना त्यांची हत्या झाली. तिसरे खलिफा उस्मान अलीपेक्षा थोर होते आणि त्यांच्या घराचा घेराव करून त्यांचा गळा चिरण्यात आला.

परंतु मातम करणारे त्यांच्या मृत्यूचा शोक साजरा करीत नाहीत. दुसरे खलिफा उमर इब्न अल-खत्ताब अली आणि उस्मानपेक्षा थोर होते आणि त्यांची मिहराबमध्ये उभे राहून फजरची नमाज अदा करीत असताना, कुरआनचे पठन करत असताना भोकसून हत्या करण्यात आली. परंतु मातम करणारे त्यांच्याही मृत्यूचा शोक साजरा करीत नाहीत.

पहिले खलिफा अबू बकर यांच्याहून थोर होते.परंतु मातम करणारे त्यांच्याही मृत्यूचा शोक साजरा करीत नाहीत. आणि शेवटी अल्लाहचे प्रेषित या साऱ्यांहूनही श्रेष्ठ आणि थोर होते. परंतु मातम करणारे त्यांच्याही मृत्यूचा शोक साजरा करीत नाहीत.”

या विपरीत आधुनिक मुस्लिमांचे कृत्य कसे आहे? एकीकडे मुस्लिम समाजातील एक गट ‘मातम’ करतो आहे. पुरुष, महिला, मुलं, मुली, इतकेच काय तर माता आपली नवजात बालकं घेऊन मातममध्ये सामील होत आहेत. मोठ्याने रडत आहेत.

अंगाखांद्यावर धातूंच्या हत्यारांचे वार झेलत आहेत. रक्त सांडत आहेत. तर दुसरीकडे मुस्लिम समाजातील दुसरा गट सरबतचे सबील जागोजागी लावतो आहे. येणा-जाणाऱ्यांना सरबत पाजतो आहे. ढोल ताशे वाजवून सवाऱ्याची मिरवणूक काढतो आहे. मनसोक्त नाचतो आहे.

या दोन्ही गटांचे म्हणणे एकच! प्रेषितांचे नातू हुसैन [रजि.] यांची अमानवीय कत्तल करण्यात आली म्हणून एक गट अतिरेकी मातम करतोय तर दुसरा गट हुसैन [रजि.] यांच्या नवजात मुलांना प्यापला पाणीही मिळाले नव्हते म्हणून सर्वांना सरबत पाजतोय. यांच्यापैकीच एक गट सवारी बसवून मनसोक्त नाचतोय. इस्लामी शिकवणीची किती ही घोर विटंबना?

अपेक्षित काय आहे?
अपेक्षित तर ते होते की भारतीय मुस्लिमांनी प्रेषितांच्या आदेशाचे अनुकरण करताना 10 मोहर्रमच्या दिवशी रोजाचे पालन करायला हवे होते. अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती.

परंतु कृतज्ञतेच्या दिवशी मातम आणि उपवासाच्या दिवशी सरबत प्रेषितांच्या शिकवणीला काळिमा फासत आहेत. 10 मोहर्रमबद्दलची सारी चर्चा करबलाच्या घटनेवर केंद्रित झाली आहे.

प्रेषितांच्या निधनाच्या अर्ध्या शतकानंतर घडलेल्या एका दुर्दैवी घटनेला आधार बनवून इस्लामी शिकवणीची क्रूर थट्टा केली जात आहे. प्रस्तुत लेखाद्वारे मुहर्रम महिन्याचा, 10 तारखेच्या उपवासाचा आणि या महिन्याच्या निषिद्धतेचा करबलाशी कसलाच संबंध नाही, हे समाजाला सांगणे अपेक्षित आहे.

सदर माहिती आपल्या देशबांधवा करिता हा विशेष लेख सादर करण्यात आला आहे.

आवडल्यास किंवा काही सूचना द्यावयाच्या असल्यास कळवा जेणेकरून अश्या प्रकारची माहिती अजून देण्यात येईल.

✒️लेखक:-प्रा.सय्यद सलमान शेरू,पुसद(पि. एच डी स्कॉलर)

▪️संकलन:-सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466