हिंदू धर्म खतरेमे है पण कुणामुळे?

33

हिंदू धर्मातून धर्मांतरित होऊन इतर धर्मात प्रवेश घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणारे व हिंदुत्ववादी सरकार सत्तेमध्ये असतानासुद्धा उत्तर प्रदेशातील हाथरस येथील वाल्मिकी समाजाच्या 50 कुटुंबातल्या 236 लोकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. कारण हिंदू धर्मात दलितांवर होणारे अत्याचार. या हाथरस च्या घटनेमुळे भारतात धर्मांतराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

हिंदू धर्माचे नुकसान पूर्वीपासून निश्चितच होत आले आहे आणि वर्तमानातही होत आहे. परंतु त्या नुकसानाची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्यापेक्षा कुणी त्यावर भाष्य केल्यास त्यावरच तुमच्यामुळे धर्माचे नुकसान होते, धर्म बदनाम होतो अशी ओरड केल्या जाते. या विरोध व आरोपांना उगाच अंगावर घेतल्यापेक्षा जसे सुरू आहे तसे सुरू राहू देण्यातच समाज सुधारक धन्यता मानतात. आसाराम-रामराहिम अशा ढोंगी संतांनी केलेल्या नीच कृत्यांमुळे हा धर्म बदनाम होत नाही तर त्यांनी नीच कृत्य केले असे म्हणणार्‍यांमुळे धर्माची बदनामी होते अशी हिंदू धर्माची आदर्श आचारसंहिता आहे. धर्माचं नुकसान होतंय पण ते कुणामुळे? कशामुळे? हे प्रश्न शेवटी अनुत्तरीतच राहतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करूया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी 5 लाख अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 5 लाख हिंदू एकाच क्षणात बुद्ध झाले. हिंदू धर्माचे किती प्रचंड नुकसान? का? तर हिंदू धर्मात माणसांना माणसांकडून माणसांसारखी वागणूक मिळत नाही म्हणून.. एकाच धर्मात असलेल्या एकच देव असलेल्या विशिष्ट वर्गाला आपल्याच देवाच्या मंदिरात प्रवेश नाही म्हणून.. जगाच्या पाठीवर असा कुठला धर्म आहे ज्या धर्मात त्या धर्मातील कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जातीवरून धार्मिक स्थळांवर प्रवेश नाकारला जातो? ज्यात आपल्याच धर्माचे धर्मग्रंथ वाचण्यास मनाई आहे? जिथे एकाच धर्मात असलेल्या एका व्यक्तीच्या स्पर्शाने, सावलीने सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला विटाळ होतो म्हणून.. जिथे माणसाच्या स्पर्शाने दुसरा मनुष्य बाटतो व जनावरांच्या मूत्राने शुद्ध होतो? धार्मिक स्थळात गेल्यावर देव बाटतो? अरे देव श्रेष्ठ, ताकदवर, सामर्थ्यवान की मनुष्य? मग माणसाच्या स्पर्शाने देव बाटायला पाहिजे की देवाच्या स्पर्शाने माणूस पवित्र व्हायला पाहिजे? मग हिंदू धर्माचे नुकसान हे सर्व निरर्थक नियम बनविणार्‍यांमुळे, त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणार्‍यांमुळे की परधर्मीयांमुळे?

मोहम्मद अली जिना बद्दल प्रचंड द्वेष आज प्रत्येक हिंदूंच्या मनात आहे. पण हेच मोहम्मद अली जिना हिंदू होते हे किती हिंदूंना माहिती आहे? ऐकून आश्चर्य वाटेल पण जिनांच्या आजोबांचं नाव प्रेमजीभाई ठक्कर, त्यांच्या वडिलांचे नाव पुंजलाल ठक्कर. लोहाना समाज असणार्‍या प्रेमजीभाईंचं कुटुंब गुजरात मधील वेरावळ येथे राहात होते. प्रेमजीभाईंचा व्यवसाय मच्छीमारीचा. लोहाना समाज म्हणजे पक्का कर्मठ, धार्मिक रितिरिवाजांना पाळणारा, पक्का शाकाहारी समाज. प्रेमजीभाईंचा मच्छीमारीचा व्यवसाय लोहाना कर्मठ लोकांना मान्य नसल्याने लोहाना समाजाने त्यांना जातीबहिष्कृत केले.

त्यानंतर प्रेमजीभाईंनी व्यवसायाचा वाढवून भरपूर पैसा कमावला. त्यांनी समाजातील प्रतिष्ठीतांना पुन्हा जातीत घेण्याची विनंती केली, परंतु समाजाने ती विनवणी धुडकावून लावली. प्रेमजीभाईंचा मुलगा पुंजलाल ठक्कर (जिनांचे वडील) यांना स्वतःच्या वडिलांना समाजाकडून मिळालेली वागणूक सहन झाली नाही आणि त्यांनी समाजाला धडा शिकविण्याच्या उद्देशाने कर्मठांच्या नाकावर टिच्चून मुस्लिम धर्म स्वीकारला व आपल्या चारही मुलांची नावे मुस्लिम नावांप्रमाणे ठेवली. आता यात दोष कुणाचा? कुणामुळे व कशामुळे जिनांच्या वडिलांना हिंदू धर्म सोडावा लागला? का स्वतःच्याच धर्मात इतकी भयंकर वागणूक मिळते की मनुष्य दुसरा धर्म स्वीकारायला सहज तयार होतो? मग मोहम्मद अली जिनांमुळे फाळणी झाली, फाळणीमुळे मोठी भीषण दंगल झाली, दंगलीत लाखो मुस्लिम हिंदू मारल्या गेले, स्त्रियांवर पाशवी बलात्कार झाले यात काही टक्के का असेना पण हिंदू धर्मातील कर्मठांचा हात निश्चितच आहे, पण आपण मुस्लिमांवर ताव काढून ह्या आपल्याच चूका झाकत नाही का?

शिवरायांच्या काळात नेताजी पालकरांच धर्मांतर 17 मार्च 1667 रोजी मुस्लीम धर्मात त्यांची सुंता करून झाल. जबरीने धर्मांतरण करून नेताजी पालकर चे मुहम्मद कुलीखान असे नामकरण करण्यात आले. 1676 मध्ये जेव्हा नेताजी पालकर पुन्हा स्वराज्यात परत आले तेव्हा महाराजांनी धर्ममार्तंडांच्या , धर्मपंडितांच्या विरोधाला अज्जीबात न जुमानता नेताजींना पुन्हा हिंदुधर्मात सामावून घेतले . मोहम्मद कुलीखान पुन्हा नेताजी पालकर झाले .याचप्रमाणे बजाजी नाईक निंबाळकर यांनासुुध्दा हिंदू धर्मात नुसतं परतच घेतलं नाही तर त्यांचा मुलगा महादेव याला स्वतःची मुलगी सुद्धा दिली.

या दोन्ही घटनांच्या वेळी महाराजांनी धर्मपंडितांना जबरीने ज्या हिंदूंचे धर्मांतरण केल्या गेले आहे त्यांना मुस्लिम धर्मातून पुन्हा त्यांच्या मूळ हिंदू धर्मात घेण्यासाठी काही तरतूद आहे का अशी विचारणा केली असता , अशी कुठलीही तरतूद , सोय वा पूजा विधी आपल्या धर्मात अजिबात नसल्याचे धर्मगुरूंनी सांगितले . त्यावर शिवरायांनी “जर आपल्या धर्मात अशी तरतूद नसेल , असे प्रयोजन नसेल तर ते तयार करा, नवीन नियम तयार करा पण आपलीच माणसे परत आपल्या धर्मात घ्या.” असे ठणकावले आणि त्या धर्मगुरूंना पालकर व निंबाळकरांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यावं लागलं .

आता दूसरं उदाहरण बघु, जम्मू काश्मीर चे तत्कालीन महाराजा रणबीरसिंग (1857-1885) यांच्याकडे मुघलांच्या काळांत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलेले राजौरी , पुंछ आणि श्रीनगर भागातील पंडीतांनी याचना केली की आमच्या पूर्वजास व आम्हास जबरीने धरून पकडून मुस्लिम करण्यात आले आहे, आम्हास आमच्या मूळ हिन्दु धर्मात परत घ्या. रनबिरसिहांनी तत्कालीन धर्मगुरू , पंडितांना बोलावून जबरीने मुस्लिम झालेल्या हिंदूंना मूळ धर्मात परत घेण्यासाठी धर्मात काही तरतूद आहे का ? विचारले असता , अशी कुठलीही तरतूद अथवा विधी हिंदू धर्मात नसल्याचे त्यांनी सांगितले . राजा रणबीरसिंहसुद्धा धर्मगुरूंच्या निर्णयाविरुद्ध गेले नाहीत . त्या जबरीने धर्मांतरण करण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांच्याच बंधूंच्या सल्ल्याने परत हिंदू करून घेतलं नाही त्याचंच फळ भारत देश आज गेली अनेक वर्षांपासून काश्मीर मुद्द्याच्या रूपाने भोगतो आहे . ज्यांनी त्या काश्मिरी पंडितांच धर्मांतरं होऊ शकत नाही असा निर्णय रनबिरसिहांना दिला होता त्यांचेच 2 लाख वंशज आज दिल्ली आणि परिसरात निर्वासितांच जगणं जगत आहेत. आज काश्मिरात मुस्लिमांची संख्या किती आहे? तेव्हढं हिंदू धर्माचं नुकसान झालंय. कुणामुळे? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म ? या प्रश्नाचं उत्तर शोधू न देण्यातच या धर्ममार्तंडांच्या वर्चस्वाचं यश लपलंय.

18 मे2017 रोजी उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथिल ग्रामीण भागातील कपूरपूर, रूपडी आणि इधरी या तीन गावातील 180 कुटुंबांनी आपल्यावर होणार्‍या अत्याचारांना कंटाळून बुद्ध धर्म स्वीकारला. या अगोदर उत्तरप्रदेशातीलच मुरदाबाद येथील काही हिंदूंनी बुद्ध धर्म स्वीकारला आहे. मध्यंतरी गुजरात मधील हजारो लोकांनी जे हिंदू धर्मात त्रस्त झाले होते त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 101 व्या सकल्पपूर्ती वर्षानिमित्त 23 सप्टेंबर 2018 रोजी वडोदरा येथे बौद्ध धर्मात प्रवेश घेतला होता.

29 एप्रिल 2018 रोजी गुजरातमधील उना येथील समढियाळ गावातील 300 दलितांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्म स्वीकारला . कारण होतं अशोक सरवैय्या आणि त्याच्या परिवारातील 3 सदस्यांना जुलै 2016 साली मेलेल्या गायीची चामडी काढण्याच्या मुद्द्यावरून तेथील सवर्णांनी केलेली जीवघेणी मारहाण. वंशपरंपरागत मेलेल्या ढोरांची चामडी काढण्याचा व्यवसाय करणाऱ्या अशोक सरवैय्या त्याचे तीन चुलतभाऊ व मोठे बाबा यांना गाईचं मास विकण्याचा आरोप लावून तथाकथित गोरक्षकांकडून उना पोलीस स्टेशन समोर कपडे काढून ढोरासारखं मारण्यात आलं. सामान्य नागरिक सोडा पण पोलिसही त्यांच्या मदतीला आले नाहीत. यात दोष कुणाचा? घटनेची शहानिशा न करता निर्णय घेऊन शिक्षा करण्याचे या गोरक्षकांना अधिकार कुणी दिले? गाईंबद्दल इतकेच प्रेम आहे तर प्रत्येक गोरक्षक 10-10 भाकड गाई(ज्या दूध देत नाहीत) ची जबाबदारी का घेत नाहीत? आणि गोभक्तांचच सरकार सत्तेत असल्यावर सुद्धा जिथे रोज लाखो गायी-बैल कापल्या जातात ते कत्तलखाने का बंद होत नाहीत? यांची उत्तरे शोधणे मात्र आपण सोयीस्करपणे टाळतो.

हिंदू असूनही दलितांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. कुठे दाढी-मुछ वाढवली म्हणून मारलं जातं, कुठे घोड्यावर बसलो म्हणून, कुठे विहिरीत अंघोळ केली म्हणून , कुठे गावात नवरदेवाची घोड्यावरून वरात काढली म्हणून जबरी मारहाण , घरे जाळली जातात, अत्याचार केल्या जातात आणि हे अत्याचार करणारे ख्रिश्चन, शीख किंवा मुस्लिम नाहीत तर आम्ही ज्या धर्मात आहोत त्याच हिंदू धर्मातील लोक हे अत्याचार करत आहेत..

सर्वात सहिष्णू आणि श्रेष्ठ म्हणवल्या जाणारा हिंदू धर्म सोडून जेव्हा हिंदूंनाच इतर धर्मात जावं लागतं तेव्हा प्रश्न पडतो की हिंदू धर्म इतकाच जर जगात श्रेष्ठ धर्म आहे तर इतर धर्मातून हिंदू धर्मात लोक का येत नाहीत? जाणार्‍यांची संख्या इतकी मोठी का? हिंदुत्वाबद्दल चीड निर्माण होईल असच वातावरण आज देशभर पाहायला मिळतंय. फक्त दलितच नाही तर इतरही अनेक जातींचे लोक हिंदू धर्माला कंटाळून इतर धर्मात जाण्याचा विचार करायला लागलेत. हिंदू राष्ट्राचे स्वप्न बघणार्‍यांकडूनच या वातावरणाला खतपाणी घालण्याचे कार्य सतत सुरू असल्यामुळे यांना हिंदूमय राष्ट्र पाहिजे की हिंदुमुक्त राष्ट्र अशी शंका मनात डोकावत राहते. वेळीच ही परिस्थिती सावरली नाही तर येणार्‍या 50 वर्षातच देशात हिंदू अल्पसंख्यांक होतील यात तिळमात्र शंका नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांचे लाखो अनुयायी, मो.अली जिनाह, लाखो काश्मिरी पंडित, उत्तर प्रदेश-गुजरात चे लाखो हिंदू-दलित, आणि आता हाथरस चे ५० वाल्मिकी कुटुंब इतकं मोठं धर्माचं नुकसान जे आजही निरंतर सुरूच आहे यावर इतर धर्मातील लोक उपाय करू शकत नाहीत. जे करायचंय ते हिंदूंनाच करायचंय. पण जोपर्यंत या देशातील हिंदू “धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म” ? या प्रश्नाचं उत्तर शोधत नाही तोपर्यंत तरी परिस्थिती बदलणं शक्य नाही.

✒️चंद्रकांत बापूराव(झटाले,अकोला)मो:-9822992666