विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे पदवीदान समारंभ संपन्न

102

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.10ऑगस्ट):-प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे विज्ञान व वाणिज्य विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ १ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाला. या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट चे संचालक माननीय प्रा. रवींद्र काळे लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉ. अंजली देशमुख संचालक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती लाभल्या होत्या, तसेच या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉ अलका भिसे आणि महाविद्यालयाच्या IQAC समन्वयक तथा वनस्पति शास्त्र प्रमुख माननीय डॉ. सुचिता खोडके उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या नंतर अतीथीचे स्वागत करण्यात आले..

त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अलका भिसे यांनी या पदवीदान समारंभाची प्रस्तावना केली. त्यांनी आपल्या प्रस्तावनेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पदवी मिळाल्याबद्दल सर्व प्रथम त्यांनी विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या मार्गदशनपर भाषणातून विद्यार्थ्यांना या पदवि वरच न थांबता पुढे पुढे शिकत राहण्याचा सल्ला दिला. कौशल्य तसेच व्यक्तीमत्व विकास कसा होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. या नंतर शिक्षक प्रायोजित पुरस्कार प्रदान करण्यात आले. या मध्ये कु. शिवानी जयस्वाल हिला वनस्पतिशास्त्र विषयात प्रावीण्य मिळवल्याबद्दल स्व. श्री विनायराव खोडके स्मृति पुरस्कार डॉ. सुचिता खोडके यांनी प्रदान केला. त्या नंतर स्व. श्री रमेशराव सोनटक्के स्मृति पुरस्कार कु. प्रणाली ठाकरे हिला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. अंजली देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्व. श्री विठ्ठलराव भिसे स्मृति पुरस्कार कु. रोजीना रेहमान शेख हिला प्राचार्य डॉ अलका भिसे यांच्या हस्ते देण्यात आला.

स्व. श्री सुधाकरराव महल्ले स्मृती पुरस्कार कु. शिवानी जयस्वाल हिला डॉ. प्रतिभा महल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्व श्री बाळकृष्ण वडतकर स्मृती पुरस्कार अर्पित बेलसरे याला डॉ. अनंत वडतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. फिजिक्स या विषयांमध्ये द्वितीय सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल श्री अजय अंभोरे यांच्यातर्फे ऋषिकेश तिमाने यास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्व श्री गुलाबराव देशमुख स्मृती पुरस्कार गणित या विषयात सर्वोच्च गुण मिळाल्याबद्दल अर्पित बेलसरे यास डॉ प्रीती देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. तर गणित या विषयात द्वितीय सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल ऋषिकेश तिमाने यास डॉ अभिजित बनसोड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. केमिस्ट्री या विषयात सर्वोच्च गुण मिळाल्याबद्दल अर्पित बेलसरे यास श्री निलेश पडोळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मराठी विषयात द्वितीय सर्वोच्च गुण मिळाल्याबद्दल स्व. कु. अदिता गवळी स्मृती परितोषिक कु. कीर्ती गौरकर हिस डॉ. योगेश गवळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

स्व श्री डेविड तायडे स्मृती पुरस्कार इंग्रजी विषयात द्वितीय सर्वोच्च गुण मिळाल्याबद्दल पवन खंडारे व कु स्नेहा इटणकर यांना श्री राजीव तायडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्व श्री नानासाहेब तायडे स्मृती पुरस्कार वाणिज्य विषयात प्रथम आलेल्या कु. रहमान शेख हिला डॉ. प्रफुल्लकुमार तायडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विज्ञान विभागात प्रथम आल्याबद्दल कु. तब्बासून शाह वहीब हिला महाविद्यालयाकडून प्राचार्य माननीय डॉ अलका भिसे यांच्याकडून प्रदान करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉ. अंजली देशमुख संचालक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती यांचा कार्य परिचय डॉ. गजेंद्रसिंग पचलोरे यांनी करून दिला. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ.अंजली देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या स्पर्धेकरिता आत्मविश्वास एकाग्रता जिद्द चिकाटी आधी गुणांचा विकास करण्याचे आवाहन केले. याकरिता त्यांनी श्री शरद बाविस्कर यांची भुरा कादंबरीचा संदर्भ दिला.

मार्ग कितीही खडतर असला तरी आपल्याला यशस्वी वाटचाल करून उत्तुंग यश मिळवावेच लागेल. जुन्या सोबत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःचा विकास करावाच लागेल. तसेच त्यांनी आपल्या भाषणातून नवीन शैक्षणिक प्रणाली बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आजच्या या स्पर्धेच्या युगात मागे राहून चालणार नाही आपली प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने सदैव पुढेच ठेवावे लागेल असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. “झिजून मर पण थिजुन मरू नको” असा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी काळे संचालक प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट अमरावती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शिका व समृद्ध व्हा असा संदेश दिला. दररोज नवनवीन काहीतरी शिका व आपला तसेच समाजाचा सुद्धा विकास करा नाविन्याची काच धरा नवनवीन तंत्रज्ञान करून प्रगती करा दुसऱ्यांवर विसंबून न राहता आत्मनिर्भर बना व प्रगती करा असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या पदवीदान समारंभात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रीती देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजीव तायडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.