वेणूताई चव्हाण कॉलेज कराड येथे एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

52

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.11ऑगस्ट):; “जगात अवयव दानाचे महत्व सर्वश्रेष्ठ असून तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तर अनेक व्यक्तींचे जीवन बदलू शकतो. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो. आपण सर्वजण मिळून सर्व समाजामध्ये अवयवदानाबद्दल जनजागृती करूया, त्यासाठी प्रयत्न करूया. अवयवदान हे जिवंत असताना व मृत्यूनंतरही अशा दोन्ही वेळेस करता येते. एक व्यक्ती मृत्यूनंतर आठ लोकांचे जीवन आनंदी करू शकते.” असे असे प्रतिपादन वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील नेत्र चिकित्सा विभागाचे मा. श्री नवनाथ चोपडे यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजादी का अमृत महोत्सव (स्वराज्य महोत्सव)२०२२ निमित्ताने सामाजिक शास्त्र मंडळ व विवेक वाहिनी अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेत ‘देहदान, नेत्रदान व रक्तदान जागृती’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एल. जी. जाधव हे होते.

या कार्यक्रमात वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक मा. श्री महेश शिंदे उपस्थित होते. ते म्हणाले की, “आपल्या भारत देशात अवयवदानाची अत्यंत गरज आहे. अवयवदानासाठी स्त्री पुरुष तसेच वय कमी जास्त असले तरीही अवयव दान करता येते. अवयव दान हे विद्यकिय निकषावर ठरवले जाते. मृत्यूपूर्वी व्यक्तीने अवयवदानाचा अर्ज केला असेल तर मृत्यूनंतर नातेवाईकांच्या संमतीने मृत व्यक्तीचे अवयवदान करता येते.

१८ वर्षांवरील प्रत्येकजण अवयवदानाची नोंदणी स्वतः करू शकतो. ब्रेनडेड अवस्थेतील व्यक्तीकडून अधिकाधिक अवयवदान केले जाऊ शकते.”सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भूगोलशास्त्र विभागाचे प्रा. एस. जे. सकट यांनी केले. महाविद्यालयाचा विद्यार्थी श्री गणेश मिसाळ यांनी आभार व्यक्त केले तर कु. अल्फिया मुल्ला हिने सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास जिमखाना उपाध्यक्षा प्रा. डॉ. सौ.एस. आर. सरोदे, प्रा. सौ. एस. डी. पाटील, प्रा. एस. एस. बोंगाळे, प्रा. आर. पी. पवार, प्रा. डॉ. ए. बी. मुळीक तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.