या क्रांतिवीराच्या रक्तातून रूजली स्वातंत्र्याची बिजे!

30

[क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा शहीद दिवस विशेष]

भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी देशभक्तांनी अनेक मार्ग शोधले. इंग्रजांना जरब बसावी यासाठी देशभक्तांनी क्रांतीकारक मार्गाने लढा दिला. तसेच राष्ट्ररक्षण व ब्रिटिशांपासून सुटका व्हावी, यासाठी अनेक क्रांतीकारक संघटना उदयास आल्या. मदनलाल धिंग्रा हे अभिनव भारत या क्रांतीकारकी संघटनेचे सदस्य बनले होते. या जहाल क्रांतीकारकाने लंडनमध्ये एका माजी इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला. म्हणून धिंग्रा यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या क्रांतीकारकाच्या रक्तातून महान स्वातंत्र्याची बिजे रूजली गेली, याचा येथे उल्लेख करणे जास्त महत्वाचे वाटते. असा हा लेख जरूर वाचा, अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दांत… संपादक.

भारतीय क्रांतिकारकांचा इतिहास पाहिला, तर आपल्याला असे आढळून येईल, की जरी सर्व क्रांतिकारक हे भारतभरातून येतात, तरी सुद्धा महाराष्ट्र, बंगाल व पंजाब हे प्रांत या संदर्भात अग्रेसर आहेत. पंजाबमधील आद्य क्रांतिकारक म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अशा या महान क्रांतिवीराचा जन्म दि.१८ फेब्रुवारी १८८३ रोजी पंजाबमधील एका क्षत्रिय घराण्यात झाला. क्रांतिकारी मदनलाल हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहात होते. वि.दा.सावरकर हे जेव्हा तेथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलवर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमानी व अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तेथे उपस्थित होते. मदनलाल यांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की, ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट होती. मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात अतिव देशप्रेम व देशभक्ती निर्माण झाले ते सावरकरांच्या विचारांमुळेच. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी देशभक्तांनी अनेक मार्ग शोधले. इंग्रजांना जरब बसावी, यासाठी देशभक्तांनी क्रांतीकारक मार्गाने लढा दिला. तसेच राष्ट्ररक्षण व ब्रिटिशांपासून सुटका व्हावी, यासाठी अनेक क्रांतीकारक संघटना उदयास आल्या. मदनलाल धिंग्रा हे अभिनव भारत या क्रांतीकारकी संघटनेचे सदस्य बनले होते. या जहाल क्रांतीकारकाने लंडनमध्ये एका माजी इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला. म्हणून धिंग्रा यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या क्रांतीकारकाच्या रक्तातून महान स्वातंत्र्याची बिजे रूजली गेली, याचा येथे उल्लेख करणे जास्त महत्वाचे वाटते. क्रांतिवीर मदनलाल यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते व ते तितक्याच स्पष्टपणे व्यक्त करीत असत, की परकीय शस्त्रात्रांच्या सहाय्याने दास्यात जखडून पडलेले राष्ट्र हे निरंतरच युद्धमान राष्ट्र होय. नि:शस्त्रांनी उघडपणे रणांगणात उतरून सामना देणे अशक्य असल्यामुळे आपण दबा धरून हल्ला चढविला. बंदुका व तोफा वापरायची आपल्याला परवानगी नाही, म्हणून आपण पिस्तूल वापरले. भारतीयांजवळ मातृभूमीसाठी जे काही देता येईल, तर ते स्वत:चे रक्तच आहे.

सन १९०६मध्ये ते आगबोटीवर काम करून स्वकष्टाने इंग्लंडला गेले. ते सन १९०८पासून स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर, शामाजी कृष्णवर्मा आदींच्या सहवासात आले. त्यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन मदनलालमधील क्षात्रतेज व देशप्रेम उचंबळून जागृत झाले. त्यांनी कर्झन वायली या दुष्ट, जुलमी आणि भारतद्वेषी अधिकार्‍याला संपविण्याचा निश्चय केला. लंडन येथील नॅशनल इंडियन असोसिएशनच्या सभेला व समारंभाला कर्झन येणार आहे, ही खात्रीलायक बातमी त्यांना समजली होती. समारंभात त्यांनी कर्झनच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या आणि कर्झन वायली हा तत्काळ जागच्या जागी ठार होऊन कोसळला. मदनलाल यांना तेथेच पकडण्यात आले. कारागृहात सडून सडून मरण्यापेक्षा आपल्याला फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारला केली होती. त्यामुळे लंडन येथील पेन्टेनव्हिली या करागृहात दि.१७ ऑगस्ट १९०९ रोजी सकाळी ९ वाजता या महान क्रांतिवीराला फाशी देण्यात आली.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे त्यांच्या शहीद दिनी त्यांच्या अचाट देशभक्तीला मानाचा लवून मुजरा !!

✒️अलककार:- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी[म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी]गडचिरोली,मोबा:-७७७५०४१०८६.