✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.1सप्टेंबर):- जिल्ह्यात दुर्दैवी वृत्त समोर येत आहे. बीड जिल्ह्यासह राज्यात एकीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्सव सुरू आहे. मात्र, दुसरीकडे शेतकरी कुटुंबातील महिलेवर काळाने घाला घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली आहे. यामध्ये वीज कोसळून ३५ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला. बीडच्या काळेगाव घाट गाव परिसरातील दुर्दैवी घटना घडली आहे. या महिलेच्या मृत्यूसह अन्य जण जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात दंग आहेत. याच गणेशोत्सवाच्या दरम्यान बीडच्या काळेगाव घाट या गावातील शेतकरी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सदर गावात वीज कोसळून ३५ वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. शीला आगे असं मृत शेतकरी महिलेचे नाव आहे.
नेमकं काय घडलं ?
केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील आत्माराम माणिक आगे, अन्नपूर्णा आत्माराम आगे , रामरतन चंद्रकांत आगे आणि शीला रामरतन आगे हे शेतकरी कुटुंब आहे. सांयसाळीच्या सुमारास काळेगाव शिवारात असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळली. यामध्ये शीला आगे यांचा मृत्यू झाला. या घटनेत शीला यांच्या मृत्यूसहित पती आणि २ अन्य जण जखमी झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्सव सुरू आहे. याच मुहूर्तावर पावसाने देखील आगमन केलं आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंद असतानाच महिला शेतकरी शिला आगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगे यांच्या मृत्यूने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने गावावर ऐन गणेशोत्सवात शोककळा पसरली आहे.