प्रलंबित समस्या निकाली काढा, तोच शिक्षकांचा खरा सन्मान

34

🔹काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेसमोर पुरोगामीचे धरणे आंदोलन

*वेळकाढू प्रशासन*
दोन वर्षे कोरोनाच्या महामारीत उध्वस्त झाली . त्यापेक्षा भयंकर प्रशासनाचे वेळकाढू धोरण शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरत आहे . विविध उपक्रम राबवून गाजावाजा करणारे प्रशासन राबणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडवायला कुचराई करून संघटनांच्या मागणीकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत आहे .
– *किशोर आनंदवार , अध्यक्ष*
———————————–
*प्रशासकीय सहकार्य हाच पुरस्कार*
शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे , ही अभिमानाची गोष्ट आहे . पण शिक्षकांसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या असताना अशा पुरस्कारांची बोळवण कोणत्या कामाची . शैक्षणिक वातावरण पोषक बनविण्यासाठी प्रशासनाने आपला निरुत्साह झटकून सहकार्य केल्यास खऱ्या अर्थाने शिक्षकदिन साजरा होईल .
– *लक्ष्मण खोब्रागडे ,प्रसिद्धीप्रमुख*
—————————–

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.3सप्टेंबर):- येत्या ५ सप्टेंबरला जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे . पण त्यांची कुचंबणा होईल अशा अनेक समस्या प्रलंबित असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे .महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आलेली आहे. परंतु निगरगट्ट प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याला वाचा फोडून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ५ सप्टेंबर ला शिक्षकदिनी विविध मागण्या घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर समोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करणार आहे.

उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाचे अनेक पदे रिक्त असून पदोन्नतीअभावी शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. एकस्तरबाबत न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून शुद्धीपत्रक निघाले नसल्याने शिक्षकांची आर्थिक कुचंबणा होत आहे. डीसीपीएस धारकांच्या कपातीचा अजूनही हिशोब मिळालेला नाही. वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव धूळखात पडलेले आहेत. सर्व्हिसबुक पळताळणी वेळेवर होत नसून दप्तरदिरंगाई केल्या जात आहे. विषयशिक्षकांना वेतनश्रेणी दिल्या गेली नाही, अशा विविध समस्या आ वासून असल्याने शिक्षकदिनी शिक्षकांना धरणे आंदोलन करावे लागत आहे , याकडे प्रशासन लक्ष देईल की आपले तकलादू धोरण रेटत नेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

समस्या निकाली न निघाल्यास साखळी उपोषण करण्याचे पुरोगामी समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे, राज्यसचिव निखिल तांबोळी,जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम, सुधाकर कन्नाके, लोमेश येलमुले, जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर,महिला मंच अध्यक्ष विद्या खटी, सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे,म कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, कोषाध्यक्ष लता मडावी, उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, सहसचिव दुष्यंत मत्ते, प्रमुख संघटक नरेश बोरीकर, महिला मंच प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे व सर्व तालुक्यातील संघटना पदाधिकारी यांनी ठरविले आहे. असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.