देशातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा : ॲड. वामनराव चटप

30

🔸शेतकऱ्यांचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांच्या जयंती निमित्त
गडचांदुर येथे शेतकरी मेळावा संपन्नI

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष पप्रतिनिधी)

जिवती(दि.3सप्टेंबर):- शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकऱ्यांचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांनी शेतीहिताची चळवळ उभारली. आर्थिक लढाईचे क्रियाशील जनक ठरले. देशातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा हे त्यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असून त्यासाठी सज्ज व्हा असे आव्हान माजी आमदार ॲड. वामनराव चटप साहेब यांनी शेतकऱ्यांना केले. शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांच्या जयंती निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते विलास धांडे, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती निळकंठराव पाटील कोरांगे, राजुरा नगरपरिषद माजी नगराध्यक्ष रमेश नळे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, तालुकाध्यक्ष बंडू राजूरकर, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गुंडावार, जिवती तालुकाध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार, मदन पाटील सातपुते, प्रभाकर लोडे, रवी गोखरे, रमाकांत मालेकर, ख्वाजा शेख, संतोष पटकोटवार, सय्यद इस्माईल, मुमताज अली, प्रशांत चटप, भास्कर मते आदींची उपस्थिती होती.

राज्य व देश पातळीवर सरकारचे धोरण हेचं शेतकऱ्यांसाठी मरण ठरत असल्याचे ठासून सांगितले. शरद जोशी यांची सोपी अर्थवादी मांडणी व बुद्धीकौशल्य यांमुळे राष्ट्रीय पातळीवर टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांची निवड केली. राज्यसभेचे खासदार म्हणून यशस्वी कारकीर्द राहिली. कृषीप्रधान देशात स्वातंत्र्यानंतर शेतकरी आसूड उभारणारे नेते ठरलेले शरद जोशी यांनी दाखविलेल्या वाटेवर गेल्या ४३ वर्षापासून चळवळीत कार्य करत आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहील असे ॲड. वामनराव चटप म्हणाले. तर राज्य शासनाने प्रचंड अतिवृष्टी होऊन देखील ओला दुष्काळ जाहीर न केल्याने शेतकरी संघटना आक्रमक होणार असून ९ सप्टेंबरला कोरपना येथे शेतकरी मोर्चाचे आयोजन केले असून त्यात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले.

लाखो महिलांना चांदवड येथे एकत्रित आणत महिलांच्या नावाने सातबारा करण्याचा कार्यक्रम शरद जोशींनी हाती घेतला होता. लाखो शेतकऱ्यांना सोबत घेऊन चंदीगड येथे राजभवनाला घेराव घातला. कापूस एकाधिकार योजनेच्या विरोधात ३० हजारहून अधिक शेतकऱ्यांना आंदोलनात अटक झाली. त्यांनी दाखविलेल्या वाटेने एकनिष्ठपणे ॲड. वामनराव चटप चालत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते विलास धांडे यांनी केले. तर सध्याच्या स्वार्थी राजकारणात शेतकरी संघटना हाच शेतकऱ्यांसाठी पर्याय असल्याचे मत निळकंठ कोरांगे यांनी मांडले.

कार्यक्रमाचे संचालन शेतकरी संघटनेचे युवा नेतृत्व तथा चेव्हेनिंग ग्लोबल लीडर ॲड. दीपक चटप यांनी केले. कार्यक्रमात परिसरातील शेकडो शेतकरी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी युवा आघाडीचे सचिन बोंडे, रत्नाकर चटप, कैलास कोरांगे, अनिल कौरासे, भास्कर जोगी, मोरेश्वर आस्वले, मारोती जेनेकर, कालिदास उरकुडे, सुनील मडावी, देवेंद्र ढवस, विजय नांदेकर, निलेश कुईटे, अरुण काळे आदींनी परिश्रम घेतले.