रंजित समर्थ यांची झाडी युवा चैतन्य पुरस्कारासाठी निवड

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- झाडीबोली साहित्य मंडळ झाडीपट्टीचे वैशिष्ट्ये साहित्यातून समोर आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते . याचाच एक प्रेरक भाग म्हणून दरवर्षी साहित्याबरोबर सामाजिक ,सांस्कृतिक , राजकीय आणि साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या झाडीपट्टीतील कायकर्त्यांना *झाडी युवा चैतन्य पुरस्कार* देत असते .

दरवर्षीप्रमाणे यावर्षी झाडीबोली साहित्य मंडळाच्या निवड समितीने झाडीबोली संवर्धन आणि चळवळीसाठी भरीव योगदान देणाऱ्या मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील सरपंच रंजित समर्थ यांची झाडी युवा चैतन्य पुरस्कारासाठी निवड केलेली आहे .

झाडी युवा चैतन्य पुरस्कार निवड समितीत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर , जिल्हा महिलाअध्यक्ष प्रा.रत्नमालाताई भोयर व जिल्हासदस्य लक्ष्मण खोब्रागडे यांनी मूल्यांकन व परिक्षणाचे काम केले .झाडीबोली वृद्धीच्या निकषानुसार निवड झालेल्या जुनासुर्ला येथील सरपंच रंजित समर्थ यांना १८सप्टेंबर २०२२ ला गोंडपीपरी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवस्त्र , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे . रंजित समर्थ हे मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील युवा सरपंच असून आपल्या अभ्यासू वृत्तीने गावविकासासाठी झटून विविध योजनांची यशस्वी अमलबजावणी केली आहे . सामाजिक भान असलेले रंजित समर्थ एकलव्य मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसांची जोपासना व संवर्धनाचे अनमोल कार्य करीत आहेत .

साहित्यावर प्रेम असलेले रंजित समर्थ यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याकरिता २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आपल्या जुनासुर्ला या गावी आयोजित करून पंचक्रोशीत सर्वांना साहित्य विश्वाची अनुभूती दिली . कोणावर विसंबून न राहता स्वतःला झोकून देत रंजित समर्थ यांनी विविध उपक्रम आणि लोकपरंपरांचे अद्भुत दर्शन साहित्य संमेलनातून अजरामर केले .राजकीय , सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले रंजित समर्थ झाडीबोलीचे अभ्यासक असून त्यांचा साहित्य संमेलन आयोजनातील सहभाग आणि साहित्यिक प्रवास यामुळे पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे .