भारतीय बौध्द महासभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.19सप्टेंबर):- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांच्या वतीने बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा भारतीय बौद्ध महासभा करीत असते. अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या नीट या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या पुसद येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भैय्यासाहेब उर्फ यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त पारामिता बुद्धविहार महावीर नगर येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी २०२२चे प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष विठ्ठल खडसे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा पद्मा दिवेकर ,भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ भगवान बरडे,तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवशंकर घरडे,महाविरनगर वार्ड महिला शाखा अध्यक्षा शांता मंडाले,माजी सैनिक डि.जी.कांबळे,पी.सी.शेळके,इंदुताई डोंगरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,त्यागमुर्ती माता रमाई, भैय्यासाहेब उर्फ यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन व अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी सम्यक प्रथम काळे (नीट ५३४),सुजल पद्माकर विघ्ने (सीए फाउंडेशन २८८), समृद्धी योगेश दिवेकर (नीट ६०२) या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, शाल , बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्षीय भाषणात विठ्ठल खडसे म्हणाले की हा कार्यक्रम छोटेखानी असला तरीही विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे व अशाच कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा नेहमी राबवण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील कार्यास कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद खडसे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान खंदारे यांनी केले तर आभार किसन धुळे यांनी मानले.

यावेळी पारामिता महिला मंडळ महावीर नगर व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.