डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे ?

77

गणेशोत्सव व नवरात्र उत्सव साजरा करणारा महार,मांग,चांभार मोठ्या संख्येने वाढत चालला आहे.काही लोक महारांचे बौद्ध झाले पण त्यांनी धम्म स्वीकारला नाही हे त्यांच्या आचरणातून दाखवून देत आहेत.पूर्वी ज्या धर्माने त्यांना पशु सारखी वागणूक दिली तो धर्म आणि त्यांच्या देवांनी यांना माणूस म्हणून कधीच दया दाखवली नाही. कुत्र्या मांजरांना जनावरांना पाणी पिण्याचा अधिकार होता.पण माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला त्यांच्या क्रांतिकारी विचारांशी गद्दारी करणारी एक जमात सध्या डोकेवर काढत आहे. तिला रोखण्याचे प्रयत्न आज न केल्यास ती समाजाला मोठी घातक ठरणार आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे ? असा रोखठोक प्रश्न विचारावा लागत आहे.
सम्राट अशोक कालीन धम्म विजया दिन हाच दिवस विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेण्यासाठी निवडला.त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात.त्या ऐतिहासिक दिनाला 66 वर्ष पूर्ण होत असताना.त्यांनी दिलेले बुद्ध धम्म आज ही समाजात पूर्ण रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही. आणि खूप मागे राहलो असे म्हणता येत नाही.

बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती,नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होतो. मातृसंस्थाचे प्रशिक्षक बौद्धांचार्य,केंद्रीय शिक्षक,पदाधिकारी, उपासक उपाशिका हताश पणे त्यांच्याकडे पाहतात.त्यावर उपाय योजना करण्यास ते असमर्थ ठरताना दिसतात. त्यांच्यातील संघ भावना संपली म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक मनुवादी हिंदूत्ववादी संघटना घराघरात विषमतेचे अज्ञान अंधश्रद्धा पेरण्यास यशस्वी होत आहे.

मनुवादी हिंदूत्ववादी संघटनेचे स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्मसमभाव च्या राजकीय मंत्राचा मना पासून आदर करण्याचा आव आणतात.आणि आमच्या कार्यकर्त्या नेत्यांच्या हातून वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या हिंदू धर्माचे उत्सव साजरे करून घेतांना दिसतात. गुणवंत सदावर्ते सारखा विधीतज्ञ वकील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगात आदर्श असल्याचे सांगतो.तर मग रोजगार हमीवर काम करणारा शेतमजूर,घरकाम करणारी महिला त्यांच्या मालकाने सांगितलेले उत्सव साजरे करीत असतील तर दोष कोणाला द्यावा.आम्ही कुठे कमी पडतो ते शोधले पाहिजे. आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.कारण घरात संघ नाही म्हणून त्यांचा धम्म नाही. संघ नसल्यामुळे संपूर्ण समाज व आंबेडकरी चळवळ दिशा हीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकराणी असंघटीत अशिक्षित शोषित अस्पृश्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या. आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित शोषित अस्पृश्य समाजाची काय अवस्था असेल.या चिंतेने ते सतत तळमळत.यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्यासाठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला. इंग्लंड,अमेरिका,रशिया सारख्या परदेशातून उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क,व प्रतिष्ठे साठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला. आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद,संघटना व राजकीय दबाव याचा समाजा करिता एक हत्यार म्हणून वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधीच अंगीकार केला नाही. कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले.आजचे नेते एका आमदार,खासदारकीसाठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात.तीच परिस्थिती धम्मभूमी,दीक्षाभूमी चैत्यभूमीच्या वापराची (व्यापराची) झाली आहे.ती मुक्त करण्यासाठी संघ भावना नाही. तर द्वेष भावनेने ती आणखी माणसा माणसांत विभागली जात आहे. दरवर्षी येथे एकत्र येणारी लाखोंची गर्दी ही विचारधारा मानणाऱ्या माणसांची नाही,तर स्वार्थी मतलबी भक्तांची आहे हे दरवर्षी सिद्ध होत आहे.त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे अस्पृश्य शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनत चालला आहे.

उच्चवर्णीयानी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोला भक्त (अंधश्रद) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला. त्यासाठी मनुस्मुर्ती जाळली,महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली,नाशिक काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान होते.चातुर्वण्य समाज व्यवस्थेवर घणाघाती घाव घातले,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ ला येवले येथे धर्मातराची घोषण केली आणि प्रतिज्ञा घेतली.अस्पृश शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविणार. आणि आज खरेच अस्पृश शोषित समाजात जास्तीच बद्दल झाला. त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभाव चा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकरी समाज वस्त्यातील बाल्लेकील्यात शेणखत काढून पोट भरणारयाची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाले.विविध पक्षाचे घाणीतील कार्यकर्ते म्हणून ओळखळ्या जातात.त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना, पक्षात फुट पडून वाटोळे करणे.त्यामुळेच जाहीरपणे विचारावे लागते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे ?

माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे.माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते.यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती.ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती.त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही “बुद्ध आणि त्याचा धम्म” वाचतो तसे.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला नव्हे तर सम्राट अशोक कालीन धम्म विजया दिनाचे महत्व लक्षात घेऊन त्या दिवशी धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक धार्मिक क्रांती केली.आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे.धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये.तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.यासाठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे. याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला,आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता “सर्वधर्मसमभाव” ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत.

बुद्धाचा धम्म मानवतावादी,विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे.मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो.जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो.शिल,सदाचाराची शिकवण देतो.या धर्मात धम्मात ईश्वराला,काल्पनिकतेला, कर्मकांड,व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाज यात कमी दिसते सर्वच राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभाव चा मागे जाताना दिसतात.त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे ?.याचे गांभीर्याने विचार झाला पाहिजे.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)धम्म प्रचारक,अभ्यासक ९९२०४०३८५९