हृदयद्रावक! वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत पाण्यात वाहिली; बीडमध्ये 24 तासात 2 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं

15

✒️बीड,प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.17ऑक्टोबर):-मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत झालेल्या पावसाने पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसाने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच आता बीडमधून अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.

बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

त्यामुळे आत्महत्यांचं सत्र सुरू झालं आहे. गेल्या 24 तासात बीडमध्ये 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. केज तालुक्यातील राजेगावची घटना ताजी असताना आता आष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब बाबुराव वांढरे यांनी गळफास घेवून मृत्यूला कवटाळलं आहे. केजच्या राजेगावमधील तरूण शेतकरी संतोष अशोक दौंड यांनी काल गळफास घेत आत्महत्या केली होती.

त्या घटनेला 12 तास होतात की नाही तोच दुसरी आत्महत्येची घटना समोर आली. दादासाहेब वांढरे यांच्याकडे तीन ते चार एकर जमीन आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सोबतच शासनानेदेखील कुठलीच मदतीची घोषणा केली नाही.

पिकविमा मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? लोकांचं देणं कसं द्यायचं या विवंचनेत त्यांनी शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दादासाहेब वांढरे यांच्या पश्चात एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, 24 तासात झालेल्या दोन शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.