राजनिती कि कोल्हानिती ?

25

कांग्रेस,भाजपा, राष्ट्रवादी,सेना किंवा अन्य कोणताही राजकीय पक्ष हा जनहितासाठी सत्तेकडे जातो.हाच एकमेव अजेंडा आहे.कॉमन मॅक्झीमम प्रोग्राम आहे. मिनीमम प्रोग्राम नाही.जर तसा काही अजेंडा नसेल तर इतिहासाची पाने फाडून आग लावतात.हे चुकीचे आहे.इतिहास हा कर्तुत्ववान व्यक्तींच्या कामाची नोंद असते.त्यापासून बोध ,प्रेरणा घ्यावी,हा मुख्य हेतू असतो. पण त्याऐवजी जनक्षोभ कसा करता येईल, याकडे राजकीय पक्षातील रिकामटेकडे लोकांचा कल दिसून येतो. हे चुकीचे आहे.

व्यक्ती ज्या काळात जन्माला येते, त्या काळात ती आपल्या काळातील जनजीवन सुसह्य कसे होईल, यासाठी काम करते. म्हणूनच कर्तृत्ववान माणसाला युगपुरुष,युगंधर असे म्हणतात.मी पुरूष आहे. मी या काळातील समस्यांना करंगळीवर तोलून धरतो. तो गोवर्धन पर्वत होता. तो गोसंवर्धन पर्वत होता. तो जन संवर्धन पर्वत होता. जेणेकरून माझी प्रजा सुरक्षित राहिल.त्यालाच युगंधर म्हणतात. युगपुरूष म्हणतात. काळपुरूष म्हणतात. अशा पुरुषांचे कार्य जेथे नोंद होते,त्याला इतिहास म्हणतात. राम, कृष्ण,बुद्ध, छत्रपती, गांधीजी यांचे जीवनकार्य हाच इतिहास झाला. यासारखेच कमी आधिक कार्य अन्य महापुरूषांनी केलेले असते. त्याचीही इतिहासात नोंद होत असते. ती सुद्धा दखलपात्र असते.बोधप्रद असते. प्रेरणादायी असते.

इतिहासातील घटना एक असते पण नोंद घेणारा जेथे उभा असेल तेथून तो नोंद घेतो. तो जर पांडवांच्या बाजूने उभा असेल तर पांडवाविषयी अतिरिक्त नोंद करतो.तो जर कौरवांच्या बाजूने उभा असेल तर कौरवांविषयी अतिरिक्त नोंद करतो. राहुल गांधी जर महाराष्ट्रात जन्माला आले असते तर त्यांनी सावरकरांना आदर्श म्हटले असते. शेलार कांग्रेस मधे असते तर त्यांनी राहुल गांधींची री ओढली असती.फडणवीस उत्तर प्रदेशात जन्माला आले असते तर त्यांनी सुद्धा सावरकरांवर टिका केली असती.याला स्थळमहिमा म्हणतात.विज्ञानात सापेक्षवाद म्हणतात.लॉ ऑफ रिलेटीव्हिटी .ऑब्जेक्ट चे निरीक्षण हे ऑब्झरव्हर च्या स्थळावर अवलंबून असते.पृथ्वीवरून सुर्याचे निरीक्षण आणि चंद्रावरून सुर्याचे निरीक्षण हे भिन्न असते.त्यात समन्वय करणाऱ्याला वैज्ञानिक,शास्रज्ञ,संशोधक म्हणतात.तो सापेक्ष नसतो.निरपेक्ष असतो.अशाच निरपेक्ष विचारांच्या राजकीय नेत्यांची आज उणिव आहे.गरज आहे.

सावरकरांच्या कार्याचे निरीक्षण ,समीक्षण करणारे फक्त निरीक्षक आहेत.ते वैज्ञानिक,संशोधक,तत्ववेत्ते, विचारवंत नाहीत.त्यामुळे त्या त्या निरीक्षकांनी केलेले वर्णन हे सापेक्ष ठरते.म्हणून ते वादग्रस्त ठरते.धुर्त माणसे , निष्क्रिय माणसे इतिहासातील घटनांचे वर्णन आपल्या चष्म्यातून करतात.ते वादग्रस्त आहे.ते जनक्षोभ निर्माण करणारे आहे,याची जाणीव त्यांना असते.एका घटनेचे विभिन्न मतप्रवाह असतात.याचा गैरफायदा घेतात.मुर्ख जनतेची माथी भडकावतात.ही प्रक्रिया निरंतर चालू असते.पाऊस पडतो.पाणीचा प्रवाह वाहातो.त्यात लाकडे,ओंडके,लेंडके ,पालापाचोळा वाहात जातो.त्याला कळत नाही कि मी वाहात वाहात कुठे जात आहे?

महाराष्ट्रात गुंड,गुन्हेगारांनी,टोळक्यांनी राजकीय पक्ष बनवले.चोरी, हाणामारी करून मुर्खाना सोबत घेतले.सत्तेवर आले.तेथे तिजोरीतील धन पाहून चवताळले.तेच चोर ते धन लुटण्यासाठी आपसात भिडले.एकमेकांच्या जिवावर उठले.महाभारतातील पुनरावृत्ती आज येथे महाराष्ट्रात घडत आहे.

बापाची वाटणी,माणसांची वाटणी, सत्तेची वाटणी, संपत्तीची वाटणी ,यासाठी कौरव पांडव आपसात लढत आहेत.हे राजकारण नाही.हे आहे सत्ताकारण.हे आहे मत्ताकारण.

असे वाद जाणिवपूर्वक निर्माण केले जातात.राहुल गांधी आणि सावरकर हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत.समकालीनही नाहीत.इतिहास संशोधक ही नाहीत.तर मग, त्यांच्या बाबतीत विधाने करण्याची गरजही नाही.राहूल गांधींनी भाजपच्या कामकाजावर टिका केली पाहिजे .त्यांची चुक जनतेच्या लक्षात आणून दिली पाहिजे.आम्ही त्यापेक्षा काय चांगले करू,हे जनतेला सांगितले पाहिजे.तसा विश्वास निर्माण केला पाहिजे. तर ते राजकारण ठरते.

धर्मातील,जातीमधील कटुता कमी करण्याच्या उद्देशाने भारत जोडो यात्रा अवलंबली.हा चांगला उद्देश आहे.पण त्याऐवजी येथे जातीजातींमधे,पक्षापक्षांमधे,प्रादेशिक कटुता निर्माण होत असेल तर ,ते राजकीय कार्य नाही.कालपर्यंत जो माणूस कांग्रेस चा होता,तो राहूल गांधींचे पोवाडे गात असेल, कौतुक करीत असेल तर ते महत्त्वाचे नाही.कालपर्यंत जो माणूस कांग्रेस चा विरोधक होता,तो आज कांग्रेस चा समर्थक झाला असेल तर ते खरे फलित आहे.नाना पटोलेंनी राहूल गांधींची कितीही स्तुती केली तरी ते संजय उवाच होईल.पण शिवराम पाटलांनी स्तुती केली तर ते व्यास उवाच होईल.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव