भारताचा अनमोल हिऱ्यास विनम्र अभिवादन !…

41

▪️डॉ.बी.आर.आंबेडकर स्मृतीदिन विशेष!….

जन्म : १४ एप्रिल १८९१ महू
मृत्यू : ०६ डिसेंबर १९५६ दिल्ली

भारताच्या पावन भूमीवर अनेक संत – महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्याचप्रमाणे भारत हा वीर पुत्रांचा व विद्वानांचाही देश आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. १४ एप्रिल, १८९१ मध्ये महू गावात वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी एका चमकत्या ताऱ्याचा जन्म झाला तो तारा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आईच्या नावावरूनच पाळण्यात त्यांचे नाव भीम असे ठेवण्यात आले. अशा या थोर महापुरुषात डॉ. बी.आर.आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर) यांचे नाव सर्वात वर आहे. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. त.बुद्ध, तुकाराम, कबीर व फुले बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.

डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषित, दुर्लक्षित व उपेक्षितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.

▪️डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.

▪️शैक्षणिक विचार:

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ”प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.

▪️३ गुरुंपैकी एक तात्यासाहेब फुले:

महात्मा जोतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते खुप जिव्हाळयाचे आणि वैचारिक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकात लिहून ठेवले की माझ्या तीन गुरु पैकी ” महात्मा फुले ” एक माझे गुरू आहेत. डॉ. बाबासाहेबांनी भारताचे संविधान ” ३९५ ” कलमाचे लिहले. याला कारण ” महात्मा फुले ” हे गुरु कारणीभूत आहेत. बाबासाहेबांनी भारताचे संविधान ‘ ३९५ ‘ कलमाऐवजी ‘ ३९४ ‘ किंवा ‘ ३९६ ‘ कलमाचे का लिहले नाहीत .. ? तर त्याला कारण महात्मा फुलेंनी जी शाळा चालू केली त्या शाळेचा – घराचा क्रमांक ” ३९५ ” होता. बाबासाहेबांना यातून हे दाखवायचे होते की माझ्या गुरूंनी क्रांतीकारी विचारांची मुहूर्तमेढ रोवली त्या तात्यासाहेब महात्मा फुलेंचा घराचा – शाळेचा क्रमांक ” ३९५ ” आहे व या शाळेतून महात्मा फुले या माझ्या गुरुने बहुजनांना ज्ञान देण्याची सुरूवात केली. शाळा चालू केली मग मी त्यांची आठवण व आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त म्हणुन संविधानात ” ३९५ ” कलम समाविष्ट केली आहेत. आणि महात्मा फुले यांच्या चरणांवर ” ३९५ ” कलमाचे संविधान अर्पण केले.

▪️सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.

▪️प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा :

डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, ” आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा ” यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.

▪️ स्त्रिया, शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व बहुजनांचे कैवारी :

स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. बहुजनांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्यासह सर्व समाजाच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला. बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे त्यांनी एम.ए. , पीएच.डी. ही पदवी घेतली. इंग्लंडला जाऊन कायद्याचा खूप अभ्यास केला.

भारतात आल्यावर पदोपदी अस्पृश्य म्हणून होणारा अपमान, अवहेलना त्यांना सहन होईना. १९२० साली राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने ‘ मूकनायक ‘ हे पाक्षिक काढले. १९२७ साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती . तेथे आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले. डॉ.बाबासाहेब नेहमी म्हणत की, “कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.” त्याचप्रमाणे “सचोटी आणि बुद्धिमत्ता यांच्या संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येत नाही.” नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा, माझ्या नावाच्या जयजयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले कार्य प्राणपणाने पूर्ण करा. जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर, एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवील तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री झाले. ‘ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘ म्हणून ते ओळखू लागले. त्यांनी अन टचबेल ‘ हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्यांनी २२ ग्रंथ आणि पुस्तकांचे लेखन केलेले आहेत. तसेच, बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.

त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले होते. बहुजनांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान होते. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. इ.स. २०१२ मध्ये, “द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. बाबासाहेबांनी ५ वृत्तपत्रे प्रकाशित केली होती. ग्रंथालयात हजारो पुस्तके होती. कायदेतज्ञ, तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, पत्रकार, चित्रकार, राजकारणी असलेल्या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. बाबासाहेब आंबेडकरांची भारताच्या लोकशाहीवर आणि राज्यघटनेवरची छाप सर्वश्रुत आहेच.. पण आंबेडकर एक व्यक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय.

अशा या ज्ञानसूर्याने ०६ डिसेंबर १९५६ साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा निरंतर ठसा मागे उमटवला.
भारताच्या कल्याणासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या अथांग ज्ञान सागराला विनम्र अभिवादन.🙏

✒️संकलन:-राजेंद्र वाघ (माळी)राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, धरणगाव. मो. ९४२२९४१३३३