बीसीसीआयने ऑडिट रिपोर्ट सादर करावा-हेमंत पाटील लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याची मागणी

53

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.१फेब्रुवारी):-देशातील असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या बळावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मोठे झाले. देशातील सर्वाधिक श्रीमंत मंडळ अशी ख्याती बीसीसीआयची आहे.मंडळाकडून अब्जावधीचे आर्थिक व्यवहार केले जातात. आता बीसीसीआयने गेल्या पाच वर्षांतील जमा-खर्च, ऑडिट रिपोर्ट तसेच मंडळाकडून करण्यात आलेल्या व्यवहाराचा अहवाल क्रिकेट चाहत्यांसाठी सार्वजनिक करावा, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी नुकतीच मंडळाच्या कार्यालयीन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली असून येत्या बैठकीत प्रस्ताव आणू असे सकारात्मक आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.

देशात क्रिकेट खेळाडूंची संख्या तिपटीने वाढली आहे. पंरतु, गेल्या सहा दशकांपासून देशात जेवढे क्रिकेट संघ होते,तेवढेच आजही आहेत. प्रत्येक राज्यातील क्रिकेट असोशिएशनच्या काही मर्यादा असल्याने प्रत्येक उत्कृष्ट खेळाडूला संधी मिळत नाही. अशात होतकरू आणि उत्तम क्रिकेटपटूंची संधी नेहमी हुकते. त्यामुळे ५२ नवीन संघ तयार करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. बीसीसीआयकडे प्रचंड निधी आहे. यातील केवळ २० टक्केच निधी मंडळाकडून खर्च केला जातो. उर्वरित ८०% निधी हा पडून असतो. एखादे राज्य चालवता येईल एवढा निधी मंडळाकडे पडून आहे. त्यामुळे या निधीचा सदुपयोग करीत प्रत्येक राज्यात जागतिक क्रिडा सुविधा असलेले किमान पाच स्टेडियम उभारण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

मंडळाने लोढा समितीच्या शिफारसी अद्यापही लागू केलेल्या नाहीत. या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात अन्यथा सर्वोच्च न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा देखील पाटील यांनी बीसीसीआयला दिला आहे.या आधी देखील पाटील यांनी बीसीसीआय विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. मंडळात अनेक समस्या आहेत.याच समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य पाटील सात्यत्याने करीत आहेत. असंख्य क्रीडा प्रेमींच्या बळावर संस्था मोठी झाली आहे.त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी चे गाऱ्हाने मंडळाला ऐकून घ्यावे लागतील,असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले.