महाड सत्याग्रह: पाणी पेटले!

31

[भारतीय सामाजिक सबलीकरण दिन विशेष]

दलित महिलांचा मोठा सहभाग आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांचे जीवतोड आवाहन या सत्याग्रहाचे वैशिष्ट्ये ठरले. या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना खास आवाहन केले. त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवण्यासारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज उरली नाही. तत्कालिक स्त्रिया गुडघ्यापर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. डॉ.आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्यास सुचविले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली. कृगोनि- श्री कृ. गो. निकोडे यांनी लेखात रेखाटलेली ही माहिती… 

महाड सत्याग्रह हा दि.२० मार्च १९२७ रोजी विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे, म्हणून केलेला हा सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. महामानव डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली ही पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.

भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती. ऑगस्ट १९२३मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला, त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी १९२४ साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचे काम करीत होते.

कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले, कारण उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुखही त्यांत सहभागी होते. सन १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती- सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने डॉ.आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. त्यांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी प्यायले आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी प्राशन केले. त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे पाच हजार जण या सभेसाठी व नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते. हातात काठी घेतलेले पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे प्रतिक होते.

सत्याग्रहींवर सनातन्यांचे अत्याचार झाले. जरी महाड नगरपालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले, तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच या सभेसाठी आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती, हे आपण जाणताच की! डॉ.बाबासाहेब चवदार तळ्याचे पाणी पिऊन सभेपुरते ते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, तळ्यातील पाणी बाटवल्यानंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे. धर्म धोक्यात आल्याची बोंब उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरविली. त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला व त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा उच्च जातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता.

शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. या सत्याग्रहाला गांधीजींनी पाठिंबा दिला आणि स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अशाप्रकारे हिंसा करून चुक केली आहे, असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले.

विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे, अशी अफवा उठविल्यामुळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर अत्याचार केला. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध “हिंसा करू नका!” असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला. त्याबद्दल गांधीजींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते. नंतर दि.१९ मार्च १९४० रोजी डॉ.बाबासाहेबांनी महाडमध्ये चौदावा महाड सत्याग्रह दिन आयोजित केेेला. महाड शहरात त्यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशीं महाड नगरपालिका प्रेसिडेंट ॲड.विष्णू नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करत त्यांना मानपत्र देऊन गौरविले. खोडके यांनी सन १९३१पासून त्यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता.

दलित महिलांचा मोठा सहभाग आणि बाबासाहेबांचे जीवतोड आवाहन या सत्याग्रहाचे वैशिष्ट्ये ठरले. या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना खास आवाहन केले. त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवण्यासारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज उरली नाही. तत्कालिक स्त्रिया गुडघ्यापर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. डॉ.आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्यास सुचविले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली, हे विशेष!

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे भारतीय सामाजिक सबलीकरण दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️कृगोनि:-श्री कृ. गो. निकोडे (से.नि.अध्यापक)पोटेगावरोड, गडचिरोली, जि. गडचिरोली.संपर्क सूत्र- ७७७५०४१०८६