संघर्षाचा त्रिकोण- सरकार, पोलीस आणि नागरिक

81

सरकार आदेश देणार पोलीस अंमलबजावणी करणार आणि नागरिक संघर्ष करणार सध्या आपल्या देशात हेच चालू आहे. त्यात कोणालाच कोणाची सामाजिक बांधिलकी नाही. सर्वच सरकारी खाते हे खाते आहेत. सरकारी कर्मचारी अधिकारी हे राजकीय नेत्यांची गुलामी स्वीकारून देशातील नागरिकांचे आर्थिक शोषण करीत असतात. सरकार म्हणजे कोण राजकीय पक्षांचे सत्ताधारी नेते भांडवलदारांच्या फायद्यासाठी योजना, बिल बनविणार त्यांची अंमलबजावणी कर्मचारी अधिकारी पोलीस करणार. सरकारच्या धोरणाला विरोध कोण करणार?. कामगार, शेतकरी, ग्राहक म्हणजेच नागरिक मोर्चे आंदोलने करणार पोलीस त्यांच्यावर बळाचा वापर करणार, आणि आदेशाचे पालन करणार. प्रत्येक नेता आणि शासकीय कर्मचारी अधिकारी नागरिकांचे वेगवेगळा पद्धतीने आर्थिक शोषण करणार आणि सांगणार सरकारचा आदेश आहे.आम्ही काय करणार?सरकारच्या कोणत्याही खात्यात जा चिरीमिरी दिल्या शिवाय काम होत नाही. नाहीतर एक नाही अनेक चुका काढल्या जातात.

मग कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे एक तर रोजगार बुडतो आणि येण्या जाण्याचा प्रवास खर्च चहा पाणी जेवणा चा खर्च हा आलाच. तो करण्यापेक्षा चिरीमिरी देणेच सोयीस्कर परवडते.हाच सर्व नागरिकांना सरकारी खात्याचा अनुभव आला असेल. म्हणूनच सरकारी खाते हे खातेच असते. त्यांचे मालक कर्मचारी अधिकारी असतात.एकटा दुकटा नागरिक संघर्ष करू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक खात्यातील लाभार्थीची एकजूट म्हणजेच संघटना असायला पाहिजे. आणि ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नसावी. स्वतंत्र विचारांची असावी.

मी असंघटीत नाका कामगारांची नांव नोंदणी करण्यासाठी खूप प्रयत्न करतो. पण शासकीय अडचणी दूर होत नाहीत. आणि नाका कामगारांना तेवढा दररोज संघर्ष करण्यासाठी वेळ नाही. तरी प्रत्येक तालुका जिल्ह्यात इमारत बांधकाम कामगार नाका कामगारांच्या विविध संघटना मोर्चेबांधणी करून जनांदोलन करीत असतात. ते करीत असतांना संघर्षाचा त्रिकोण सरकार, पोलीस आणि नागरिक कायम असतो.

आता नवीन समस्याकडे आपले लक्ष वळवितो. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल, हिरो होंडा, यामा, बजाज टू व्हीलर गाड्या आहे, तर नोकरी व उद्योग धंदा करणाऱ्यांकडे फोरव्हिलर गाड्या असल्या शिवाय त्यांना समाधान वाटत नाही. व ते प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. या नागरिकासाठी सरकारने वाहतूक चलन (दंड) बऱ्याच प्रमाणात वाढवला आहे, हा दंड सामान्य नागरिकांना भरणे अशक्य आहे, त्यामुळे नागरिक आणि पोलिस यामध्ये वाद दररोज कोणत्याना कोणत्या चौकात वाढत आहेत. पण हा दंड सरकारने वाढवला आहे, पोलिसांनी नाही,हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, म्हणजे पोलीस नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाले वर जो E-chalan मशीन द्वारे दंड आकारतात तो सरकार जमा होतो, आणि नागरिकांकडून वाहतूक नियम भंग झाला की दंड आकरण्याचे काम सरकारने पोलिस ना दिले आहे.

 त्यामुळे एक तर वाहतूक नियम पाळा, नाहीतर गपचूप दंड भरा, पण आपली चूक असताना पोलिसांशी वाद घालत बसू नका, त्या पोलिसांना दिवसभरात आपल्यासारख्या किती तरी नागरिकांना तोंड द्यावे लागते, संघर्षाचा त्रिकोण सरकार, पोलीस आणि नागरिक सर्वत्र पाहायला भेटतो.

पोलीस व वाहन चालक दोघांना ही खूप त्रास सहन करावा लागतो, त्यासाठीच नगरातील, विभागातील वाहन चालक मालकांनी संघटीत झाले पाहिजे.अधिकृतरीत्या संघटना बनविली पाहिजे आणि सनदशीर मार्गाने संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाशी पत्र व्यवहार केला पाहिजे. संघर्षाचा त्रिकोण सरकार, पोलीस आणि नागरिक यांचा सनदशीर मार्गाने समस्या सोडविल्या पाहिजेत. वाहन चालक मालकांनी आपल्याला दंड भरावा लागू नये याकरिता वाहतूक नियम पाळा १) आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर सर्वप्रथम काढून घ्या, त्याशिवाय गाडी चालवू नाका २) टू व्हीलरवर जाताना गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट घाला, आणि शक्य झाले तर गाडीमागे बसणाऱ्या व्यक्तीला ही हेल्मेट घालायला सांगा. ३) गाडी चालवताना आपल्या गाडीची कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्स,सोबत बाळगा. ४) गाडीचा इन्शुरन्स अद्ययावत ठेवा, संपला असेल तर पुन्हा अपडेट करून घ्या. ५) आपली गाडी शकतो दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यासाठी देऊ नका, आणि जर द्यावीच लागली तर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का ते चेक करा, ६) आपल्या टू व्हीलर वर तिसरा व्यक्ती बसवू नका. ७) आपली गाडी जर आपण एखाद्या व्यक्तीला विकली असेल किंवा विकत असाल तर ती गाडी त्या व्यक्तीने त्याच्या नावावर करून घेतली आहे का ते पहा, कारण जर ती गाडी तुमच्याच नावावर राहिली तर त्या गाडीवर पडणारा ऑनलाइन दंड आपल्या नावावर आपल्या घरच्या पत्यावर येणार, (वाहतूक कोर्ट चे पत्र आपल्या घरी येणार) ८) लहान मुलांना गाडी चालवण्यास देऊ नका, जोपर्यंत मुलगा ड्रायव्हिंग लायसन्स काढायच्या लायकीचा होत नाही, तोपर्यंत त्यास गाडी चालवण्यास देऊ नका, ९) गाडी चालवताना सिग्नल कटिंग करू नका, सिग्नल ला कॅमेरा असतो, आपल्या वाहनावर cctv कॅमेरा मार्फत दंड पडतो, आणि आपल्या गाडी नंबर वरून आपल्या घरच्या पत्यावर (मोटार कोर्टाचे) दंड आकारण्याबाबत पत्र येते, १०) सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग वर वाहन थांबवू नका, ११) लाल सिग्नल लागते वेळी गाडीचा वेग वाढवू नाका, पिवळा सिग्नल लागताच गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवा, १२) जवळचा रस्ता पडेल म्हणून उलट्या दिशेने (wrong side) ने वाहन नेवू नका, १३) गाडी नो पार्किंग एरिया किंवा फुटपाथवर पार्क करू नका, पार्किंग असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करा. १४) गाडी चालवण्या आगोदर गाडीच्या टायर मधील हवा आणि पेट्रोल चेक करा, कमी असेल तर भरून घ्या, १५) वेळीच गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या म्हणजे गाडी रस्त्यात कधी बंद पडू नये याची काळजी घ्या. १६) जड वाहतूक दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या रोड ने घेऊन जावा, १७) फोर व्हीलर, किंवा मोठी गाडी चालवताना नेहमी सीट बेल्ट चा वापर करा. १८) गाडीची नंबर प्लेट फॅन्सी असेल किंवा तुटलेली असेल तर ती बदलून टाका, व्यवस्थित मोठ्या अक्षरात गाडी नंबर दिसेल अशी नंबर प्लेट गाडी ला लावा. १९) खाजगी गाड्यावर पोलिस किंवा इतर काही मजकूर लिहू नका, २०) आपल्या वाहनाला दोन्ही बाजूला आरसे आसने गरजेचे आहे २१) आपल्या वाहनाला कर्कश्य हॉर्न बसवू नका. २२) फोर व्हीलर ला डार्क काळ्या काचा बसवू नका, गाडीमधील माणूस बाहेरच्या व्यक्तीला दिसेल अशी काच बसवावी. २३) गाडीची फ्रंट लाईट आणि बॅक लाईट आणि पुढील व मागील इंडिकेटर बंद असेल किंवा तुटलेले असेल तर ते दुरुस्त करून घ्या.२४) गाडीवर किंवा गाडीमध्ये बसून राहून गाडी रस्त्यावर थांबवून मागून येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण करू नका.आपण जर वरील सर्व नियम आपल्या वाहनांच्या बाबतीत पाळत असाल तर आपल्या हातून कधीही वाहतुक नियमांचा भंग होणार नाही, आणि आपल्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही, जर आपण कोणताही नियम मोडला तर वाहतूक पोलिसांना दोष देऊ नका, मुकाट्याने दंड भरा, आणि गप निघून जा, आणि यावेळी दंडाची रक्कम सरकारने बऱ्याच प्रमाणात सरकारने वाढवली आहे, ती रक्कम सामन्य नागरिकाला भरणे कठीण वाटते,त्यामुळे आपण आपले वाहन योग्य रीतीने वापरा आणि चालवा. हा वाहन चालक मालकावर अन्याय आहे हे शंभर टक्के सत्य आहे त्यासाठी सरकारला ही त्याच पद्धतीने दंड करता येतो. त्यासाठी आपण संघटीत झाले पाहिजे. काय करू शकते संघटना ते डोक्यात ठेवा. रोड कोणत्या खात्याच्या अंतर्गत येतो. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ State Public Works Department (PWD) Ministry of Road Transport & Highways, Government of India. मुंबईसह राज्यात ८८ टक्के प्रवासी सार्वजनिक रोड वाहतुकीचा वापर करतात.

मुंबईतील बस परिवहन व्यवस्था आहे ही भारतात सगळ्या शहरांत सर्वात मोठी आहे. वाहन चालक मालक संघटना युनियन काय करू शकतात.खराब सिग्नल असेल तर सबंधित जबाबदार अधिकारी यांना दहा हजार रुपये दंड,रस्त्यावर खड्डे असल्यास सबंधित जबाबदार अधिकारी यांना वीस हजार रुपये दंड, रोडवर खड्डे खोडून व्यवस्थितपणे बनविले नाही म्हणून सबंधित जबाबदार खड्ड्यात पडून वाहनाचे व वाहन चालकाचे नुकसान झाल्यास अधिकारी यांना दवाखाना व वाहन खर्च अधिक पाच हजार रुपये दंड.असे कायद्यानुसार वाहन चालक आणि मालकांना संघटनेच्या वतीने सरकारच्या या उन्मत्त अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करता येऊ शकते. म्हणूनच त्रिकोणी संघर्ष टाळावा.राजकारणी राज्यकर्ते आणि सर्वच खात्याचे कर्मचारी अधिकारी नागरिकांचे ग्राहकांचे वर बोट दाखवून आर्थिक शोषण ते संघटीतपणे करतात म्हणूनच आपण ही संघटीत झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिवराज्य वाहतूक संघटना रविंद्र सूर्यवंशी यांनी स्थापन केली आहे. त्यांनी वाहतूक संबधित अधिकारी आणि चालक मालक अनेक समस्या चर्चा करून सोडविले आहेत. “मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही” संघटीत होऊन संघर्ष केला तर यशस्वी होता येतो. म्हणूनच संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि नागरिक संघर्ष पत्र व्यवहार करून टाळावा.नसेल तर शक्ती प्रदर्शन आवश्यक आहेच.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९