शैक्षणिक संस्थांना देय असलेली शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये : प्रसाद कुळकर्णी

27

🔸विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दस्ताऐवज त्वरित उपलब्ध करावे

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.25जुलै):-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विजाभज, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील किंवा तत्पूर्वीची शैक्षणिक संस्थाना देय असलेली शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे, या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येवू नये. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व दाखले, प्रमाणपत्र व अनुज्ञेय आवश्यक दस्ताऐवज त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण प्रसाद कुळकर्णी यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना केले आहे.

कोविड-19 या विषाणूचा परिणाम राज्यातील जनतेच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला आहे. राज्यातील बहुतांशी व्यावसायिक लघुउद्योग तसेच अल्प, मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तींना आर्थिक उत्पन्नाचे साधन शिल्लक राहिलेले नाही. राज्यातील उद्योगधंदे तसेच राज्याच्या महसूलात भर टाकणारे उत्पन्नाचे स्त्रोत ठप्प झाल्यामुळे राज्याच्या महसूलात कमालीची घट झालेली आहे.

या पार्श्वभूमीवर विजाभज विमाप्र, इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक संस्थांना अनुज्ञेय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करणे शासनाला शक्य झाले नाही.तथापी काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांची अनुज्ञेय शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त असल्याच्या सबबीखाली जिल्हातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक बिगर व्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करणे तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्था सोडल्याचा दाखला देण्याचे नाकारत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे.या काळात कोणतेही विद्यार्थ्यांची अडवणूक होता कामा नये व सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.