एक मानवतावादी शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम

29

🔹27 जुलै – डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिना निमित्त लेख

एकीकडे “स्वप्न म्हणजे ते नाही जे तुम्हाला झोपेत पडते, स्वप्न म्हणजे ते जे तुम्हाला झोपुच देत नाही. ‘असे म्हणणारे राष्ट्रसमर्पित व्यक्तिमत्व तर दुसरीकडे’ low aim is a crime, स्वप्ने मोठीच बघा आणि त्यांना पुर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा’. म्हणणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व असलेल्या भारतरत्न मानवतावादी थोर शास्त्रज्ञ व भारताचे राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ आॅक्टोबर १९३१ ला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथील गरीब कुटुंबात झाला. त्यांचे पुर्ण नाव अवुल पाकिर जैनुल्लादिन अब्दुल कलाम आणि त्याच्या आईचे नाव आशियामा होते.पेपर वाटण्यापासुन खडतर आयुष्याची सुरुवात करणाऱ्या एका व्यक्तिवर जेव्हा जगातील लहान मोठ्या सर्व पेपर मध्ये स्तुतीसुमनांनी उधळन होते तेव्हा ‘अतिसामान्य ते असामान्य’ या प्रवासाचे ते एक उदाहरण आहेत. अनेक मार्गदर्शक पुस्तकांमधून आशावादी लिखाण करून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी व युवकांना सत्य, विकास, नितीमत्ता राष्ट्निर्माणाचा मार्ग दाखवित असत. युवकांचा आत्मविश्वास जागृत करतांना नेहमीच, “ज्या दिवशी तुमची स्वाक्षरी आटोग्राफ मध्ये बदलली तर समजायचं की आपण आपल्या जीवनकार्यात यशस्वी झालो.” अशी शिकवण द्यायचे.

भारताचे ११ वे राष्ट्रपती हे आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत लोकांसाठी जगुन लोकांचेच बनुन राहिलेले असे एक व्यक्तिमव होते कारण ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होते.
एकदा डॉ.कलाम मिसाईल चाचणीत इतके रममाण झाले की, स्वतःच्या भाचीचेही लग्न विसरून गेले. कधी शाळेत जेवणाच्या पंगतीत आनंदाने लहान मुलांना वाढणे, तर कधी आपली खुर्ची इतरांपेक्षा वेगळी आहे, हे आढ़ळल्याने ‘मलाही साधीच खुर्ची द्या’ म्हणत बड़ेजाव टाळणे.
अगदी २०१२ ला देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीत ‘राष्ट्रपती पदाबाबत राजकारण होणे योग्य नसुन सर्वसंमती असेल तरच मी उभा राहील’ म्हणत राष्ट्रपतीपदावर सुद्धा पाणी सोडले.

वयाच्या ८३ व्या वर्षीही युथ आयकॉन असणे किंवा राष्ट्रप्रमुख असतांनाही आपल्यात एक कॉमन मॅन जपणे, असे कितीतरी पैलु आपल्याला डॉ. कलामांनी आधुनिक काळातही एका साधुप्रमाणे निर्मोही आयुष्य व्यतीत केल्याचे दाखले देतात.
जगातील सर्वश्रेष्ठ संशोधकांपेेकी एक असूनही शिक्षणाचे महत्व ओळखून आपली ओळख केवळ एक शिक्षकाची रहावी, कारण ‘शिक्षकांची राष्ट्रनिर्माणातील भूमिका अतुलनीय असते’, असे म्हणत ज्ञानदानाच्या पवित्रकार्याचा केलेला योग्य असा गौरव करणे.

नातलग दिल्लीला आल्यावर स्वतःच्या खिशातुन केलेला त्यांच्यावरचा खर्च असो किंवा कायम गरजु संस्थाना केलेले आपल्या मासिक मानधनाचे वाटप असो, ही उदाहरणे अगदी सहज सांगतात की, ह्या आदर्श व्यक्तिमत्वाची, ट्रक भरून असणारी एकमेव संपत्ती म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तके होती?
‘नि:संशय देशाने सर्वाधीक प्रेम केलेला राष्ट्रपती’ अशी ओळख असणाऱ्या ह्या मिसाईल मॅन च्या आठवणी जनतेच्या मनात कायमच राहतील ह्यावर कोणाचेही दुमत असु शकत नाही.

‘मी मरेन त्या दिवसाला सुट्टी जाहिर करु नका तर एक दिवस जास्त काम करा’ म्हणत always nation first हा त्यांच्याच संदेश अंगीकारुन आधुनिक स्वप्नातिल भारताचे निर्माण करु शकतो.
भारताच्या ह्या थोर सुपुत्रास,मानवतावादी शास्त्रज्ञ डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
दीपस्तंभ भारताचे अग्निपंख ज्यांचे, मनोरे उंच स्वप्नांचे.
शिल्पकार जे विज्ञान युगाचे,नवचैतन्य जे युवापिढीचे

✒️सौ जयश्री निलकंठ सिरसाटे
राज्य समन्वयक अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
मो:-9423414686 (गोंदिया)