पार्टीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रांकडून मित्राचाच खूनाचा प्रयत्न

33

🔺अहमदनगर जिल्ह्यातील घटना

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.27जुलै):-पार्टीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रांकडून मित्राचाच खूनाचा प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यात घटना
अहमदनगर– पार्टी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागावलेल्या सात ते आठ मित्रांनी आपल्याचा मित्राचा धारदार शस्त्राने व लाथाबुक्यांनी मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नगर शहरातील टांगेगल्ली येथे रविवारी (दि.26) मध्यरात्री घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, सागर साहेबराव खरमाळे (वय-30,रा. भुषणनगर, केडगाव) हा त्याच्या मित्रांसह कल्याण रोडवरील हॉटेल दिनेश जवळ गप्पा मारत उभा असताना तेथे स्वप्निल उर्फ सोन्या राजु दातरंगे (रा. नालेगाव), कुमार कचरे (रा. भुतकरवाडी), आप्पा बांगर (रा. हिवरेबाजार), राजु नेटके (रा. भुतकरवाडी), राहुल कोकणे (रा. जाधवमळा)(पुर्ण नाव माहित नाही), राजु रमय्या दास (रा.बोरूडेमळा) व त्यांचे अन्य दोन साथीदार यांनी खरमाळे यास पार्टी करण्यासाठी पैशांची मागणी केली.

यावर खरमाळे यांनी पार्टीसाठी पैसे देण्यास नकार दिला. यावर पार्टीसाठी तुच काय? तुझा बाप पण पैसे देईल, असे म्हणुन दमदाटी करून तेथुन निघुन गेले. त्यानंतर रात्री खरमाळे हे नालेगाव, टांगेगल्ली येथून जात असताना दातरंगे याच्यासह त्याच्या अन्य साथीदारांनी खरमाळे यांना रस्त्यात अडवुन पैसे न दिल्याच्या रागातुन धारदार शस्त्राने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला.

या प्रकरणी फिर्यादीवरून कोतवाली पोलीसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 307, 329, 143, 147, 148, 149, भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी तत्परतेने हालचाल करून यातील सहा जणांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भंगाळे करीत आहेत.