देश गुलामीत,पण चिमूर स्वतंत्र

32

🔹१६ आगस्ट १९४२ चा रणसंग्राम

🔸क्रांतीच्या ज्वालांतून उगवली स्वातंत्र्याची पहाट

🔹शहीद स्मृतिदिन विशेष

✒️आशिष गजभिये-खडसंगी(चिमूर)जिल्हा-चंद्रपूर (मो:-9822783149)

८ आगस्ट १९४२ ला गवलीया टॅंक मैदान मुबंई येथे भारत छोडो आंदोलनातून महात्मा गांधीनी करा अथवा मरा चा नारा दिला गांधीजींच्या या संदेशाने सारा देश इंग्रजाणंविरुद्ध पेटून उठला.महात्मा गांधींच्या या संदेशाने सारा देश इंग्रजाणंविरुद्ध पेटून उठला.महात्मा गांधींच्या या संदेशाने चिमूर येथील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेऊन जनजागृती करीत स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले. या राणशिंगाने प्रेरित होऊन चिमुरातील युवक, वृद्ध व महिला यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारात १६ आगस्ट १९४२ ला सर्कल इन्स्पेक्टर जरासंध, पोलीस कांताप्रसाद, नायब तहसीलदार सोनवाने, एसडीओ डुंगाजी या इंग्रज अधिकाऱ्यांचा वध करून इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून तिरंगा ध्वज फडकविला व सलग तीन दिवस स्वातंत्र उपभोगले.तेव्हा १६ आगस्ट १९४२ ला सारा देश इंग्रजांच्या गुलामीत होता. मात्र चिमूर शहर स्वतंत्र झाले होते.

भारतातील अनेक संस्थानावर मोघल, अकबर, औरंगजेब अशा अनेक राजांनी आक्रमण करून सत्ता उपभोगली.मात्र या सर्वांमध्ये भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्षाच्या कारभारामध्ये इंग्रजांनी भारतीयांवर अनेक अन्याय अत्याचार करून भारतीयांना जेरीस आणले होते.इंग्रजांच्या या जुलमी राजवतीविरुद्ध भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची एक लाट निर्माण झाली होती. यासाठी भगतसिंग, राजगुरू यासारखे क्रांतिकारक ब्रिटिश सरकारविरुद्ध पेटून उठले तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वात शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू होते.

८ आगस्ट १९४२ ला ग्वालिया टॅन्कवरून महात्मा गांधींनी दिलेल्या करा अथवा मरा या संदेशाने चिमूर येथील क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध पेटून उठले . १६ आगस्ट १९४२ ला सकाळी ९.००वाजता गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व प्रभातफेरी काँग्रेस सेवादलचे श्रीराम बिंगेवार , सखाराम माटेवार,बाबूलाल झिरे, दादाजी किरीमकर , मारोती खोबरे, गणपत खेडेकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते.ही प्रभात फेरी जुना बसस्टँड जवळून निघाली.या प्रभातफेरीत ‘व्हाइसरॉय दिल्ली मे जुते खाये गल्ली मे ‘ या घोषणा देत प्रभातफेरी नागमंदिराकडे निघाली. कारण हा दिवस नागपंचमीचा होता.दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रवचन सुरू होते.या प्रवचनामध्ये चारशे ते पाचशे नागरिक प्रवचन ऐकत होते. तत्कालिन ठाणेदार हरिराम शर्मा व क्रांतिकारक पांडुरंग पोतदार या दोघांनीही महारांजाणपुढे आपली बाजू मांडली होती.त्यावर महाराजांनी दोघांनाही समजावले.दोघेही आपल्या ठिकाणी योग्य आहे.तुम्ही दोघेही आपलं काम करा, तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल , असा सल्ला दिला.

आदल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देशभक्तीच्या विचारांनी ओतप्रोत भरलेले प्रभावी भजन झाले. या भजनाने क्रांतिकारकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटली होती.सर्वांच्या मनांत फक्त क्रांती, क्रांती आणि क्रांती हाच शब्द घुमत होता.भारत मातेचे स्वातंत्र्य रूप क्रांतीकारकांना दिसत होते.

‘ गुलामी अब नही होना , हमारे प्रिय भारत देश मे’ व पत्थर सारे बाँब बनेगे भक्त बनेगी सेना ‘ या भजनाने क्रांतिकारक आणखी इंग्रजांविरुद्ध सलाखून निघाले होते.
क्रांतिकरकांपैकी सेवादलाचे उद्धवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा बिगुल फुंकला व सारे कार्यकर्ते अभ्यंकर मैदावर येऊन ‘ भारत माता की जय ‘ अशा घोषणा देऊ लागले .तेवड्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यवीराचा हातातील तिरंगा झेंडा हिसकावून घेतला व बारा क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले.या घटनेने चिडून क्रांतीकारकांनी आपला मोर्चा इंगज अधिकाऱ्यांकडे वळविला. या क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकारी डुंगाजी, सर्कल इन्स्पेक्टर जरासंध , तहसीलदार सोनवाने व कांताप्रसाद यांचा वध केला.याकरिता अनेक क्रांतीकारकांना लाठीमार खावा लागला तर बालाजी रायपूरकर , श्रीराम बिंगेवार व बाबूलाल झिरे यांना वीरमरण पत्करावे लागले.

१६ आगस्ट १९४२ च्या या चिमुरकरांनीं केलेल्या क्रांतीमुळे पूर्ण देशामध्ये चिमूर शहर १६,१७,१८ आगस्ट या तीन दिवस स्वतंत्र झाले होते.या स्वातंत्र्याची घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओ वरून केली होती.चिमूर शहरात झालेली १६ आगस्ट १९४२ ची क्रांती पूर्ण देशामध्ये अजरामर आहे.क्रांतीच्या ज्वालांतूनच चिमुरात स्वातंत्र्याची पहाट उगवली होती.हे पारतंत्र्याचे तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी चिमुरकरानां अशी झुंज द्यावी लागली होती.

 

चिमूर स्वतंत्र संग्रामातील शहीद वीर:-

१) बालाजी राघोबा रायपूरकर
२)श्रीराम गंगाराम बिंगेवार
३)बाबूलाल पंचमसिंग झिरे
४) कटुजी झिटू झाडे
५)मानिराम धानु गोंड
६) पत्रू वारलू भुसारी
७) रामा तिमा बारापात्रे
८) उद्धव खेमस्कर
९)वारलू बालाजी चन्ने

 

 चिमुरकरांनी दिला दीड लाखांचा लगान:-

ब्रिटिशांना चिमुरातून हाकलून लावत १६ आगस्ट १९४२ हे तीन दिवस स्वतंत्र झाले होते.या स्वातंत्र्य ची किंमत इंग्रजांनी दिड लाखांचा लगान वसूल करून घेतली.

१६ते १८ आगस्ट १९४२ हे तीन दिवस चिमूर शहर स्वतंत्र झाले होते.यानंतर चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी सुब्रमण्यम इंग्रज सैन्यासह चिमुरात दाखल झाले व चिमुरात जळून नष्ट झालेले पोलिस स्टेशन , डाग बंगला , दवाखाना या स्थळांची पाहणी केली.क्रांतिकारकांच्या ताब्यात असलेले ठाणेदार रामाशंकर शर्मा व पोलीस प्रधान प्रसाद यांना क्रांतीकारकांच्या ताब्यातून सोडविले.गावात १४४ कलम जाहीर करून ४२ वाहनातून ब्रिटिश सेना चिमुरात दाखल झाली .या फॉजाणी दिड लाखाचा लगान वसूल केला.

 राष्ट्रसंताना जिल्हाबंदी:-

८ आगस्ट १९४२ ला महात्मा गांधींनी ग्वालिया टॅन्क मैदानावरून इंग्रजांना ‘चले जावं ‘ चा नारा देत भारतीयांना ‘ करो या मरो’ या संदेश दिला या संदेशाची दखल चिमूर शहरातील कार्यकर्तानी घेतली.व इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकले.या लढ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या युवकांना प्रेरित करणाऱ्या भजनानेच क्रांती झाली.त्यामुळे या चिमुरच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कारणीभूत ठरवून राष्ट्रसंताना इंग्रजांनी चंद्रपूर जिल्ह्यातुन दोन वर्षे नऊ महिन्यासाठी जिल्हा बंदी केली.