गडचिरोली जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

32

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.20ऑगस्ट):-जिल्हयात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने मोठया प्रमाणात पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असते. दिनांक 22 ऑगस्ट 2020 पासून जिल्ह्यात गणेशोत्सव तसेच दिनांक 30 ऑगस्ट 2020 रोजी मोहरम उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 20 ऑगस्ट ते दिनांक 03 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) लागु करण्यात आलेले आहे.

त्यामुळे या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमाकरणे, तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे किवा अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतेही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे किंवा प्रसार करणार नाहीत. पोलिस विभागाच्या पुर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक 20 ऑगस्ट 2020 ते 03 सप्टेंबर 2020 पर्यंतच्या 24 वाजेपर्यंत कोणीही जमा होणार नाहीत. हे कलम गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.