दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार – धनंजय मुंडे

25

🔹दर आठवड्याला बैठक घेऊन आढावा घेण्याच्या धनंजय मुंडे, खा. सुप्रियाताई सुळे यांच्या विभागाला सूचना

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.27ऑगस्ट):-दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण, यासह दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्यासंदर्भात दिव्यांग हक्क विकास मंचाच्या निमंत्रक खा. सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दिव्यांग हक्क विकास मंचाच्या कामांना गती देणार असून दिव्यांगांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वेबिनार बैठकीमध्ये याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सहसचिव दिनेश डिंगळे, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी दत्ता बाळसराफ, दिव्यांग हक्क विकास मंचाचे संयोजक विजय कान्हेकर अन्य पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित व वेबिनार द्वारे सहभागी होते.

मार्चपासून कोरोनामुळे मंदावलेल्या कामांना वेग देण्याबाबत सूचना ना. मुंडे यांनी संबंधितांना केल्या. तसेच खा. सुप्रियाताई सुळे यांनी सुचवल्याप्रमाणे त्याचा आढावा दर आठवड्याला सादर करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या बैठकीमध्ये नवीन शैक्षणिक धोरण व दिव्यांगांच्या आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम, महाराष्ट्र शासनाचे दिव्यांग धोरण – २०१८ व कृती आराखडा, दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी व त्याचा विनियोग आदी विषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग पुनर्वसन केंद्रांच्या बळकटीकरण करण्यासंदर्भात विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.

या बैठकीमध्ये दिव्यांगांसाठीच्या विशेष शाळांची नोंदणी सुलभ करणे तसेच विविध विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे जसे की श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव आदी उपलब्ध करून देण्यासाठी २०१५ मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यासाठी विभाग निहाय वेबिनार आयोजित करून त्याचा आढावा विभागास सादर करण्याचे निर्देशही ना. मुंडेंनी यावेळी दिले.

स्टार की फाउंडेशन अमेरिका व सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक श्रवणयंत्र, दिव्यांगांना कृत्रिम अवयव, ज्येष्ठ नागरिकांना विविध आवश्यक साहित्य आदी उपलब्ध करून देण्याचे निश्चित झालेले आहे. याअंतर्गत जालना व बीड या दोन जिल्ह्यात सर्वेक्षण करून आरोग्य शिबीर संपन्न झाले आहे. तर जालना जिल्ह्यात श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरीत जिल्ह्यातील या कामांना गती देण्याबाबतही निर्देश ना. मुंडे यांनी यावेळी दिले.

दरम्यान दिव्यांग हक्क विकास मंचाचे संयोजक विजय कान्हेकर यांनी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ना धनंजय मुंडे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दिव्यांग बांधवांच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्याची आपली भूमिका असून, या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन घेऊन आपण स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. मुंडे यांनी या बैठकीत सांगितले.