छत्रपती शंभूराजेंचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी शौर्यस्थळी ‘शंभूसृष्टी’ निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार मा. छगन भुजबळ

29

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

तुळापूर(दि.16जानेवारी):- छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट यांच्या वतीने तुळापुर येथे आयोजित छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक सोहळा आज पार पडला. यावेळी आमदार अशोक बापू पवार, ट्रस्टचे अध्यक्ष प्रदिप कंदे, मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, उद्योगपती एल.बी.कुंजीर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे पदाधिकारी राजाराम निकम, विकास पासलकर, शिवगौरव पुरस्कार प्राप्त सावरगाव हडप गावचे पदाधिकारी अनुप मोरे, शंकर भूमकर, अनिल भुजबळ, प्रदीप कंदे, लोचन शिवले, दिपक गावडे, लतिका आव्हाळे, ज्ञानदेव सुतार, शेखर पाटील यांच्यासह परिसरातील शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शंभूराजेंचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी शौर्यस्थळी ‘शंभूसृष्टी’ निर्माण करण्यासाठी व या शौर्य स्थळाच्या विकासासाठी शासनस्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल.

छत्रपती शंभुराजे यांच्या राज्यभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून नतमस्तक होण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला मिळाली हे माझे भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं स्वराज्य या स्वराज्याचा विस्तार अधिकाधिक वाढविण्याचे काम छत्रपती शंभूराजे यांनी केले. स्वराज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक लढाया लढल्या त्यातील कुठल्याच लढाईत त्यांना अपयश आले नाही. सर्वच्या सर्व लढाया यशस्वी करणारे ते छत्रपती होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधण्याचे काम महात्मा जोतीराव फुले यांनी केले. तसेच त्यांच्यावर पहिला पोवाडा देखील त्यांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य समाजासमोर आणण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण असे काम केले. महाराष्ट्राच्या या भूमीत ज्या महापुरुषांनी समाजपरिवर्तनासाठी काम केले अशा सर्व महापुरुषांचा इतिहास हा आपल्या नव्या पिढीसमोर व जगासमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सिरीयलच्या माध्यमातून संभाजी महाराज यांच्या शौर्याची याशोगाथा घरांघरापर्यंत पोहचविली त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक.

छत्रपती संभाजी महाराज यांचे मराठी, संस्कृत, हिंदी भाषेवर प्रचंड असे प्रभुत्व होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचा विस्तार करण्यामागे त्यांचे कार्य महत्वपूर्ण होते. छत्रपती शंभूराजे यांच्या लढायांचा व त्यांच्या जीवनाचा इतिहास जगासमोर मांडण्यासाठी त्यांच्या स्मारकाच्या कामासाठी आपण पाठपुरावा करू तसेच या शौर्य स्थळाचे महत्व अधिक वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. मात्र दरवर्षी हा राज्यभिषेक सोहळा साजरा करून छत्रपती शंभूराजे कार्य लोकांसमोर मांडण्याचे कार्य अविरत सुरु राहिले पाहिजे असे आवाहन यावेळेस आयोजकांना केले.