ऑपरेशन मुस्कान’ मुळे फुलले हास्य

83

घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, मुंबईचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले मुंबईत दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुले मबईतील रस्त्यांवर, फूटपाथवर, रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर भटकत असतात. भीक मागून पोटाची खळगी भरत असतात. यातील काही मुले वाम मार्गाला लागतात तर काही मुले असेच अनाथ म्हणून भटकत असतात. तर काही मुलांना गुंड मवाली जबरदस्तीने भीक मागायला लावतात. त्या मुलाचा गुंड मवाली अतोनात छळ करतात. या अनाथ मुलांना पुन्हा स्वगृही पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान नावाची एक अत्यंत स्तुत्य मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील तीन वर्षात १०, १४९ मुलांना त्यांच्या कुटुंबाकडे पाठवण्यात आले आहे.

मागील महिन्यांत म्हणजे जून महिन्यात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत ठाणे पोलिसांनी ४३ मुली व २१ मुले अशा एकूण ६४ अल्पवयीन मुलांचा शोध घेत या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे विशेष म्हणजे शोधलेल्या मुलांमध्ये पोलीस ठाण्यात नोंद नाही अशीही काही मुले मुली आहेत. या ऑपरेशन मुस्कानमुळे हजारो बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. ही मोहीम राबवण्यासाठी पोलिसांनी विशेष आराखडा तयार केला. ज्या ठिकाणी मुले भीक मागतात अशी ठिकाणी पोलिसांनी शोधून काढली. या ठिकाणी अतिशय गुप्तपणे कारवाई केली. या मुलांना भीक मागायला लावणाऱ्या रॅकेटचा शोध घेतला त्यांना अटक केली आणि हजारो मुलांची सुटका केली. मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन या मुलांचे प्रबोधन करण्यात आले. या मुलांच्या पालकांचा शोध घेतला राज्यभरातील ही मुले असल्याने या मुलांच्या पालकांचा शोध घेणे व मुलांना त्या पालकांच्या ताब्यात देण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते ते आव्हान पोलिसांनी लीलया पेलले.

ही मोहीम अतिशय स्तुत्य आणि अनुकरणीय अशी आहे. ही मोहीम राबणाऱ्या पोलीस दलाचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे. पोलिसांनी हजारो मुलांना अनाथ होण्यापासून आणि वाममार्गाला लागण्यापासून वाचवले आहे. ही मोहीम सुरू करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागेल. ऑपरेशन मुस्कान ही मोहीम फक्त मुंबई पुरतीच मर्यादित न राहता राज्यातील सर्व महानगरात राबवायला हवी म्हणजे अनाथ, बेघर झालेल्या लाखो मुले स्वगृही परततील आणि स्वगृही परतणाऱ्या त्या मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड पुणे)