मुल शहरातील ८०० पुरग्रस्‍तांना प्रत्‍येकी ५ हजार रूपये नुकसान भरपाई मंजूर

28

🔸३० जुलै ला पूरग्रस्तांना वितरीत होणार धनादेश

🔹माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

मुल(दि.28जुलै):-शहरात अतिवृष्‍टीमुळे ज्‍या घरांमध्‍ये पाणी शिरून नुकसान झाले अश्‍या ८०० घरांना झालेल्‍या नुकसानाची भरपाई म्‍हणून प्रत्‍येकी ५ हजार रू. चे धनादेश दि. ३० जुलै रोजी संबंधितांना वितरित करण्यात येणार आहे. यासाठी तातडीने ४० लक्ष रूपयांचे अनुदान वितरीत करण्‍यात आले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत तातडीने दखल घेत केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.

मुल शहरात अतिवृष्‍टीमुळे सुमारे ८०० घरांमध्‍ये पाणी शिरून मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांची पडझड सुध्‍दा झाली. याची तातडीने दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी चंद्रपूर यांना त्‍वरीत पंचनामे करण्‍याचे निर्देश देत नुकसान भरपाई देण्‍याबाबत अवगत केले. याबाबत त्‍यांनी मा. मुख्‍यमंत्र्यांची देखील भेट घेतली व चर्चा केली. यासंदर्भात झूम प्रणालीद्वारे घेतलेल्‍या बैठकीत देखील आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले.

अतिवृष्‍टीदरम्‍यान नागरिकांच्‍या घरात पाणी शिरून नुकसान झाले असताना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांच्‍या चमू पाठवून जीवनावश्‍यक वस्‍तुंच्‍या किट्स देखील त्‍यांनी वितरीत केल्‍या. पुरग्रस्‍तांच्‍या पाठिशी आपण खंबीरपणे उभे असल्‍याचे सांगत त्‍यांना भाजपा कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातुन धीर दिला. या नुकसानाच्‍या पार्श्‍वभूमीवर ८०० नुकसानग्रस्‍त घर धारकांना प्रत्‍येकी ५ हजार रूपये मदत तातडीने मिळणार असल्याने त्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुरग्रस्‍तांच्‍या वेदना जाणून घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार व पुरग्रस्‍तांसाठी मंजूर केलेली नुकसान भरपाई मुल शहरात कौतुकाचा विषय ठरली आहे. ज्‍या घरांची पडझड झाली आहे अश्‍यांना देखील लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्‍यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार प्रयत्‍नशील आहे.