धक्कादायक! भगर खाल्याने विषबाधा; बीड, औरंगाबाद, जालन्यात खळबळ

33

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.27सप्टेंबर):-नवरात्रोत्सवानिमित्त उपवासात भगर खाल्याने अनेक लोकांना विषबाधा झाल्याची घटना बीडसह औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे.विषबाधा झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बीडमध्ये कोळवाडी, जुजगव्हाण, पाली, रंजेगाव या चार गावांमध्ये नवरात्रीच्या उपवासात भगर खाल्याने जवळपास 70 ते 80 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

यात लहान मुले आणि महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उलटी मळमळ आणि पोटात दुखणे या त्रासामुळे जिल्हा रुग्णालयात जवळपास 50 ते 60 महिला उपचार घेत आहेत. तर इतर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शालेय चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

औरंगाबादेत 13 जणांना विषबाधा…
________________
औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी 13 जणांना विषबाधा झाली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त भगर व भगरीचें पीठ परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थांनी खरेदी केले होते. मात्र या भगरीचे सेवन केल्याने 13 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पोट दुखणे, उलट्या, चक्कर येत असल्याने गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

जालन्यात 24 जणांना विषबाधा…
______________
बीड आणि औरंगाबाद प्रमाणे जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात देखील भगर खाल्याने 24 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.