विनायक देशमुखांचे ‘आठवणींचे मोहोळ’ युवापिढीसाठी दिशादर्शक ठरेल – डाॅ. रणजित पाटील

    38

    ✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा-विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

    खटाव(दि.9डिसेंबर):-चाफळच्या मातीत अनेक प्रतिभावंत माणसांनी जन्म घेतला. त्यांनी आपल्या अलौकीक कर्तुत्वामुळे चाफळचे नाव मोठे केले. चाफळ फाऊंडेशनही मुलांच्या विकासासाठी चांगले काम करत आहे. मातीशी नाळ घट्ट असणा-या विनायक देशमुख यांचे ‘माझ्या आठवणींचे मोहोळ’ हे पुस्तक निश्चितपणे युवा पिढीसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास सातारा जिल्हा पोलीस उपअधिक्षक डाॅ रणजित पाटील यांनी व्यक्त केला.

     चाफळ (ता.पाटण) येथे विनायक देशमुख यांनी लिहलेल्या ‘माझ्या आठवणींचे मोहोळ’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी राम भोसले, माजी जि प सदस्य डी वाय पाटील, धनंजय सिंहासने, सिनेअभिनेते समृद्धी जाधव, वसंतराव देशमुख, सौ विजया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

    डाॅ रणजित पाटील म्हणाले, चाफळ मध्ये अनेक कर्तृत्ववान व्यक्ती होऊन गेल्या आहेत. जागतीक पातळीवर त्यांनी गावचा नावलौकीक वाढवला. पण आज दुदैवाने युवा पिढीत आत्मविश्वास दिसत नाही. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढायला पाहीजे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चाफळ फाऊंडेशन चांगले काम करत आहे. नवोदित लेखक विनायक देशमुख प्रतिभावंत लेखक आहेत. चाफळच्या मातीत घडलेले प्रसंग त्यांनी उत्तमपणे रेखाटले आहेत. त्यांच्याकडे लिखानाची वेगळी क्षमता आहे. त्यामुळे विनायक देशमुख यांचे पुस्तक युवापिढीसाठी दिशादर्शक ठरेल.

     विनायक देशमुख यांनी, आजच्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा अतिरेक टाळायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आज मैदानाकडे पाठ फिरवली आहे. सक्षम पिढी घडवायची असेल तर खेळ महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील जुन्या खेळाडूंना न्याय मिळावा यासाठी पुस्तक लिहले आहे. पुस्तकाच्या रूपाने आयुष्य घालविलेल्या खेळाडूंच्या स्मृती आठवणीत रहाव्यात हा हेतू आहे असे सांगितले.

    यावेळी राम भोसले, समृद्धी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी संजय देशमुख, दादा कदम, रामचंद्र हणबर, अॅड शिरीष पेंढारकर, राजेन्द्र पाटील, राम बोर्गे, शिवाजी चव्हाण, रवि पाटील, दिपक पाटील, राजकुमार साळुंखे, चाफळ फाऊंडेशनचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रशांत जाधव यांनी केले. तर आभार विनायक देशमुख यांनी मानले.