ग्राहकांच्या मागणीनुसार शेतीपिकांचे उत्पादन घ्यावे

    36

    ?‘विकेल ते पिकेल’ कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचना

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    चंद्रपूर(दि.18डिसेंबर):-ग्राहकांना काय हवे आहे याचा अंदाज घेवून त्यानुसार शेतकऱ्यांनी शेती पिकाचे उत्पादन घ्यावे तसेच ग्राहकांना देखील घराजवळच गरजेनुसार शेतमाल मिळाल्यास त्यांचा देखील खरेदीवर भर राहील. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक फायदा होईल, तरी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आज कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.

    ‘विकेल ते पिकेल’ संकल्पनेवर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत कृषी व संलग्न विभागाच्या जिल्हा व तालुका स्तरीय अधिकारी यांची एक दिवसीय कार्यशाळा आज मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या दादासाहेब कन्नमवार सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातील जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या मोहिमेला दिलेला शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.

    राहुल कर्डिले यांनी यावेळी शेतकरी गटांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन केले. तर जिल्हा अग्रणी व्यवस्थापक शंभुनाथ झा यांनी शेतकऱ्यांकरिता कृषी अवजारे, ट्रॅक्टर व इतर साहित्य विकत घेण्यासाठी दिर्घ मुदतीचे कर्ज मंजूरीसाठी बँकेत विशेष कक्ष स्थापीत केला असल्याची माहिती दिली. या प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, सनदी लेखापाल श्री. मुरारका, कार्यक्रम समन्वयक डॉ. विनोद नागदेवते, विद्या पाल, प्रफुल्ल मोकळे, श्री शेंडे, समन्वयक, प्रकाश खोब्रागडे यांनी यथोचित मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाचे संचालन तंत्र अधिकारी गणेश मादेवार यांनी केले. कार्यशाळेला कृषी विभागाचे सर्व उपविभगीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा परिषद चे कृषी विकास अधिकारी, आत्मा चे सर्व अधिकारी, एमएसआरएम व व्हीएसटीएफ चे जिल्हा आणि तालुका समन्वयक, माविम चे जिल्हा आणि तालुका समन्वयक, बँक चे एलडीएम आणि जिल्हा समन्वयक, केव्हीके चे कार्यक्रम समन्वयक यांची उपस्थित होते.