धम्मभूषण ॲड . अप्पाराव मैंद यांचा सत्कार

32

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.1फेब्रुवारी):-येथील प्रसिद्ध विधीतज्ञ,सत्यशोधक विचारवंत,पुसद अर्बन या मल्टिस्टेट बँकेचे तसेच भारती मैंद नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष ,साहित्यिक आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीस आयुष्य समर्पित करून बुद्ध तत्वज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी पुसद येथे सांडवा मांडवा रोडवर आपल्या मालकीच्या शेतात २० वर्षांपूर्वी चार्वाक वनाची स्थापना करणारे ॲड . *अप्पाराव मैंद यांना अमरावती च्या महाबोधी संस्थेच्या वतीने धम्मभूषण पुरस्कार* जाहीर करण्यात आला आहे. नेर वटफळी येथे येथे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या धम्म परिषदेत धम्मप्रिय महाथेरो (कपिलवस्तू),भदंत प्रा. सुमेधबोधी आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक धम्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

उमरखेड येथील सुमेध बोधी विहारास सदिच्छा भेटीसाठी ते काल आले होते. त्यावेळी त्यांच्या या धम्म कार्यासाठी त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या विहार समिती तर्फे विजयराव खडसे(माजी आमदार),डॉ प्रेम हनवते,(जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग) भीमराव सोनूले(सचिव)विरेंद्र खंदारे, कमलाकर कांबळे,दत्तराव वाडेकर गोवंदे, मंडले सर आणि माजी न्यायाधीश धोंगडे साहेब यांच्या हस्ते शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना डॉ .प्रेम हनवते म्हणाले की, ” खऱ्या अर्थाने धम्म भूषण पुरस्कार अतिशय योग्य व्यक्तीला जाहीर झाला आहे. यामुळे या पुरस्काराचा तो सन्मान आहे. सिद्धार्थ गौतम या क्षत्रिय राजपुत्राने दिलेला धम्म हाच आपला जीवन मार्ग आहे याची खात्री झाल्यावर त्याच क्षत्रिय राजपुत्राच्या मराठा कुळातील अप्पाराव मैंद यांनी भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.चार्वाक वनामध्ये दर पूर्णिमेस बुद्ध तत्वज्ञानवर मंथन करण्यासाठी ते महाराष्ट्रातील नामवंत विद्वानांना बोलावून व्याख्याने घडवून आणतात.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज ,म. फुले, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विचारवंतांची दिशादर्शक व्याख्याने आयोजित करून साजरी करतात. तसेच त्यनिमित्याने स्मरणिका देखील प्रकाशित करतात. या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.यामध्ये क्रांतिसूर्य जोतिबा, स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या अग्रणी सावित्रीबाई फुले, सामाजिक क्रांतीचा अंकुर, मंडल आयोग, युगप्रवर्तक भाऊसाहेब, कथा शिव पुतळ्याची इत्यादी. वयाच्या ७९ व्या वर्षी देखील ते आपल्या परखड आणि अभ्यासपूर्ण वाणीतून ते क्रांतीची बीजे सातत्यपूर्ण पेरत आहेत.शेतकरी आंदोलन, कामगार चळवळ, नामांतर चळवळ रिडल्स प्रकरणात यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

त्यांच्या या कार्यामुळे प्रेरित होऊन विविध समाजाची माणसे त्यांचे सहकारी बनून त्यांच्यासोबत कार्य करत आहेत. सर्व समाजाला डोळस करण्याचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना हा धम्मभूषण पुरस्कार जाहीर झाला त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.” यावेळी त्यांनी लिहिलेले *सत्यशोधक यादव राव पाटील आणि यवतमाळ जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळ* हे पुस्तक उपस्थितांना भेट देण्यात आले. सुमेध बोधी विहार समितीच्या कामाचे स्वरूप पाहून त्यांनी समितीचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. अनिल काळबांडे ,सचिव भीमराव सोनूले आणि सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन केले.संतोष निथळे, राहुल काळबांडे,उत्तम शिंगणकार यांच्या पुढाकाराने हा सुंदर छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला