समुह शेतीची संकल्पना प्रत्यक्षात राबवा कृषी मंत्री – दादाजी भुसे

28

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.12फेब्रुवारी):- शेतकरी गट आणि शेती उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची थेट विक्री केल्यास शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा फायदा होईल. या उद्देशाने ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित बाजारात ज्या पिकाला मागणी आहे तेच पीक शेतकऱ्यांनी पिकविण्याची आवश्यकता आहे. यासाठी समुह शेतीची संकल्पना प्रत्यक्षात राबविल्यास शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला.

शिंगाडा तलाव येथील कृषी भवन येथे संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उप विभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र पाटील, सहायक व्यवस्थापक योगेश बिडवे, तालुका कृषी अधिकारी रविंद्र वाघ, योगेश बिडवे, श्रीकांत बेहरे, अतुल भावसार, जितेंद्र शहा, विश्वास बर्वे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र कृषीउद्योग विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी भवनाच्या आवारात ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर कायमस्वरूपी केंद्र सुरू करण्यात आले असून शेतकरी गटांनी पहिल्याच दिवशी शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री केली. तर कृषी उद्योग विकास महामंडळाचे उत्पादन असलेल्या उत्पादन विक्री केंद्राचाही शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.