जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार- दिव्यांगांच्या साहित्य वाटपासाठी तारिख पे तारीख

27

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.16फेब्रुवारी):- सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (अलीम्को), जिल्हा प्रशासन नांदेड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने त्यावेळेसचे जिल्हाधिकारी अरून डोंगरे यांच्या पुढाकारातून दि १० डिसेंबर २०१९ ते दि २६ डिसेंबर २०१९ दरम्यान नांदेड शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील १६ हि तालुक्यांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे व वयोश्री योजणे अंतर्गत सेवाज्येष्ठ नागरीकांसाठी विविध साधने व संसाधने मोफत वाटपासाठी लाखों रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते,तसेच या शिबीरातील साहित्य हे तीन महिन्यांतच म्हणजे मार्च २०२० मध्येच भेटणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

त्यामुळे या शिबीरात जिल्हाभरातील जवळपास १५ हजारांच्या वर दिव्यांगांनी तपासणी केली होती परंतु प्रत्यक्षात त्यांना साहित्यच भेटले नव्हते परीणामी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी सर्व दिव्यांग संघटणांना एकत्रित घेऊन विविध आंदोलने उपोषणाच्या माध्यमातून मागणी लावून धरली होती शेवटी जिल्हा प्रशासनाकडून दि २३ जानेवारी २०२१ रोजी शहरातील कौठा परीसरातील ओम गार्डन येथे मोठ्या थाटामाटात पालकमंत्री.खासदार.आमदार.जिल्हा परिषद अध्यक्ष.मनपा महापौर यांच्यासह ईतर शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या समक्षात उद्घाटन सोहळा संपन्न करून घेतला.

यावेळी दिव्यांगांच्या विविध शासकीय योजनांच्या विकासात्मक बाबींवर आणि धोरणात्मक पुनर्वसना संदर्भात मोठ मोठी भाषणे करण्यात आली होती तसेच या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती देत महाराष्ट्र शासनाचा गौरव सुद्धा केला होता परंतु ऊद्घाटनाप्रसंगी लाखों रुपये खर्च करून काही मोजक्याच दिव्यांगांना साहित्य वाटप करत जिल्हा प्रशासनाने अकलेचे तारे तोडत जिल्ह्या भरातील शेकडो दिव्यांगांना तारिख पे तारीख देत अद्याप साहित्याचा लाभ देण्यात आला नसल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.