रामदासांचा छत्रपती शिवराय यांचे सोबत संबंध नसल्याचे झाले सिध्द

200

🔸उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.8मार्च):- छत्रपती शिवरायांना रामदासांच्या पाया पडताना दाखवून अवमान प्रकरणी अहमदनगरला दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.सामाजिक बांधिलकीतून शिवस्फूर्तीने खटला चालविणारे महाराष्ट्र गोवा-बार कौन्सिलचे सदस्य,औरंगाबाद खंडपीठातील जेष्ठ विधिज्ञ ऍड. वसंतराव साळुंके, ऍड.मयुर साळुंके यांचे जाहीर आभार….

१ मार्च २००८ रोजी दासनवमी निमित्त समर्थ विद्या प्रसारक मंडळ,अहमदनगर यांच्या समर्थ प्रशालेने अहमदनगर शहरातून काढलेल्या प्रचार फेरीत “छत्रपती शिवाजी महाराज रामदासांच्या पाया पडताना” अशा पद्धतीचा जिवंत देखावा सादर केला होता. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी सदर देखाव्या बाबत आक्षेप घेत कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर येथे समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त लक्ष्मीकांत कृष्णराव कुलकर्णी, सचीव विश्वेश यशवंत भालेराव, तत्कालीन मुख्याध्यापिका दमयंती कमलाकर कुलकर्णी या तिघां विरोधात फिर्याद नोंदवली होती. संजीव भोर यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी गुन्हा दाखल करण्यासाठी जोरदार आंदोलनही करण्यात आले होते.त्यानुसार भादवि कलम 295(अ),34 अन्वये गु. र. नं आय 80 /2008 दि.2/3/2008 कोतवाली पुलिस स्टेशन अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संजीव भोर यांनी वादग्रस्त देखाव्याचा फोटो, वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे देऊन,तसेच तपासात अनेक प्रथितयश इतिहास संशोधकांचे लिखीत म्हणने, सरकारचा पुरातत्व विभाग,बालभारती, भांडारकर संस्था,आदींचे छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी याबाबत लेखी म्हणणे पुराव्यादाखल सादर केले होते.दासनवमी निमित्त रामदासांच्या अनुयायांनी त्यांचे वस्तुनिष्ठ,वास्तव चरीत्र जरूर दाखवावे.मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासांच्या पाया पडताना दाखवणे यामागे संबंधितांचा हेतू प्रामाणिक नसून जाणीवपूर्वक असा खोडसाळपणा करण्यात आलेला आहे अशी भूमिका घेत समर्थ विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त लक्ष्मीकांत कुलकर्णी,सचिव विश्वेश भालेराव व मुख्याध्यापिका दमयंती कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे समाजविघातक कृत्य विद्यार्थ्यांच्या हातून करून घेतले आहे व तमाम शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावून राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे असे फिर्यादी भोर यांची तक्रार होती.

छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासांच्या पाया पडताना दाखविल्यामुळे अवमान झाल्याचा असा गुन्हा पहिल्यांदाच दाखल झाल्याने या बाबत प्रचंड चर्चा व वाद विवाद त्यावेळी झडले होते.गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यात तीनही आरोपींनी अटकपूर्व जामीन घेऊन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतली होती.त्यावेळी सुनावणी होऊन गुन्ह्याच्या तपासात पुढील आदेश होईपर्यंत मा.उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली होती.
सदर महत्वपूर्ण प्रलंबित खटल्यांची सुनावणी दिनांक 16 जुलै 2018 रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मा. न्यायाधीश टी व्ही नलावडे व मा. न्यायाधीश के एल वडणे यांच्यासमोर झाली. सदर गुन्ह्यातील तीन आरोपींपैकी लक्ष्मीकांत कुलकर्णी हे काही वर्षांपूर्वी मयत झाल्याने उर्वरित दोन आरोपी श्री विश्वेश भालेराव व सौ दमयंती कुलकर्णी यांचेवतीने ज्येष्ठ विधिज्ञ विजय दीक्षित यांनी बाजू मांडली.फिर्यादी संजीव भोर यांचेवतीने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.वसंतराव साळुंके, अॅड.मयुर साळुंके यांनी युक्तिवाद केला.

भोर यांचे वतीने बाजू मांडताना अॅड वसंतराव साळुंके यांनी रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असलेबाबत किंवा त्यांची भेट झाली असलेबाबत कुठलेही ठोस पुरावे नाहीत, ऐतिहासिक प्रसंगाबाबत शाळा-महाविद्यालयांमधून सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये इतिहास कालीन वस्तुनिष्ठ पुरावे,तत्कालीन संदर्भ नसलेले काल्पनिक प्रसंग दाखवून विद्यार्थ्यांना एकांगी विचार देणे, तसेच समाजात,विविध जाती-धर्मियांत तेढ निर्माण करणे हे समाजविघातक व सामाजिक शांततेस बाधा आणणारे कृत्ये आहे, आरोपींनी सदर कृत्य केले असल्याबाबत स्पष्ट पुरावे फिर्यादीने सादर केलेले आहेत.त्यामुळे अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांना कायदेशीर चपराक आवश्यक आहे ‌ असा जोरदार युक्तिवाद केला.छत्रपती शिवाजी महाराज व रामदास यांची भेट झाल्याचे किंवा रामदास शिवरायांचे गुरु असल्याचे कुठलेही वस्तुनिष्ठ पुरावे नाहीत हे विविध कागदपत्रांसह त्यांनी न्यायालयासमोर जोरकसपणे सादर केला.

मा.उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला.अशा पद्धतीच्या संवेदनशील विषया बाबत शालेय विद्यार्थ्यांकडून वादग्रस्त देखावा सादर करणे योग्य आहे का असा प्रश्न मा.न्यायालयाने उपस्थित करून,तसेच शिक्षण संस्था व शाळा महाविद्यालयांशी संबंधित व्यक्तींनी आपल्या विचारधारा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर लादणे योग्य नाही अशी टिप्पणी करीत सदर गुन्हा रद्द करण्याची आरोपींची मागणी फेटाळून लावली.त्यामुळे पोलिसांना सदर गुन्ह्याचा पुढील तपास पूर्ण करून दोन आरोपींवर आरोपत्र दाखल करावे लागणार आहे.
औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड वसंतराव साळुंके,अॅड.मयुर साळुंके यांनी या संवेदनशील, महत्त्वपूर्ण खटल्यामध्ये अभ्यासपूर्वक गांभीर्याने बाजू मांडून न्याय मिळवून दिल्याबद्दल संजीव भोर यांनी तमाम शिवप्रेमी जनतेच्या वतीने श्री साळुंके यांचे आभार व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.

महामानवांच्या नावाचा वापर करीत, इतिहासाची सोयीस्कर मोडतोड करून व आपापल्या विचारधारा लादून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रकार समाजात नित्याने पहावयास मिळत आहे.ब्राह्मणवादी असेल किंवा तथाकथित परिवर्तनवादी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महामानवांबाबत अवास्तव,चुकीच्या बाबी पसरवण्याचा प्रयत्न केल्यास यापुढेही अशाच पद्धतीने संघर्ष केला जाईल. मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.अशी प्रतिक्रिया यावेळी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील व जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगळे पाटील यांनी व्यक्त केली.