राज्यपालांच्या भेटीत सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

27

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.२१मार्च):- हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे करणार आहेत. उद्या दुपारी वंचितचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ते काल सोलापूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणातील क्रिमिनल एलिमेंट व एडमिनिस्ट्रेटिव मधील क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन काय काय घडवून आणू शकतात याचे चित्र आपण पाहात आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी शंभर कोटी रुपये कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी असला तरी त्यामध्ये नेक्सेस उभे राहिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

उद्या दुपारी सव्वाबारा वाजता राज्यपालांनी भेटीची वेळ दिली असून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन देणार आहोत. हे सरकार बरखास्त करावे मात्र सरकार बरखास्त करीत असताना सभागृह बरखास्त करू नये असेही राज्यपालांना सांगणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी चे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत, ॲड. धनराज वंजारी तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर हे या शिष्टमंडळात असतील अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली