संजयबाबूंच्या निधनाने वरोरा- भद्रावती मतदार संघाची हानी – खासदार बाळू धानोरकर

34

ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वारसा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निस्वार्थपणे सांभाळणारे माजी मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. संजयबाबू देवतळे यांच्या निधनाने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे, अशा शोकभावना चंद्रपूर- वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.संजयबाबू देवतळे यांनी वरोरा-भद्रावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्याच मतदार संघात सेवा करण्याची संधी मलाही आमदारकीच्या रूपात मिळाली.

आज त्याच्या विकासाचा रथ आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, अतिशय शांत, संयमी लोकप्रतिनिधी कायमचा हरवल्याने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे. मी २००९ मध्ये पहिल्यांदा त्यांच्याच विरोधात विधानसभा लढली. मी तेव्हा हरलो.

मात्र, संजयबाबू जिंकल्याचा तितकाच आनंद होता. कारण ते मंत्री होऊ शकले आणि वरोरा- भद्रावती मतदार संघाचे नावलौकिक केले. हा मनातील आनंद मी त्यांना भ्रमणध्वनीवर विजयी शुभेच्छा देताना बोलून दाखविला होता. पक्षीय मतभेद विसरून कामे करणारा नेता आपल्याला सोडून गेल्याचे दुःख आहे.त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व या क्षेत्रातील त्यांच्यावर प्रेम करणा-या जनतेला या दुखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना…!