मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स

30

✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)

मंत्र्यांचे फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. सदर समन्स हे महाराष्ट्र सायबर सेलने पाठवले आहे. रश्मी शुक्ला सध्या सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत.
एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स पाठवण्यात आले. बुधवार दि. 28 एप्रिल रोजी जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सायबर सेलचे तपास पथक दिल्लीला रवाना झाले आहे.

रश्मी शुक्ला सध्या CRPF मध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.दरम्यान रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकारमधील व राज्यातील काही मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद असल्यानेच त्यांनी अशी टॅपिंग केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.सदर प्रकरणी जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थितीत फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणे दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा त्यांनी केले आहे.